लातूर : प्रतिनिधी
बँकांत कर्मचा-यांच्या नियुक्त्या या कंत्राटीकरणाच्या माध्यमातून होण्याऐवजी कायमस्वरुपी पद्धतीने व्हाव्यात, ही मागणी ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनन या ए. आय. बी. इ. ए. शी संलग्न संघटनेने बँक ऑफ महाराष्ट्राच्या देशभरातील सर्व क्षत्रिय प्रबंधकांच्या मार्फत निवेदनाद्वारे बँकेच्या चेअरमन यांचेकडे केलीआहे.
या वर्षाची डॉ. आंबेडकर जयंती या संघटनेने कंत्राटीकरण ‘हटाव – आरक्षण बचाओ’, अशी देशव्यापी मोहीम घेऊन साजरी करण्याचे ठरविले आहे. त्या निमित्ताने लातूरच्या बँक ऑफ महाराष्ट्र झोनल मॅनेजर यांना बहुसंख्य कर्मचारी यांच्या शिष्टमंडळाने त्यांना निवेदन सादर केले. या प्रसंगी बोलताना संघटनेचे नेते कॉ.धनंजय कुलकर्णी म्हणाले की, महाराष्ट्र बँकमध्ये शिपाई व सफाई कर्मचा-यांच्या अनेक जागा गेली दहा वर्षे म्हणजे २०१४ पासून रिकाम्या असताना त्या कायमस्वरुपी भरण्याऐवजी बँकेचे व्यवस्थापन मनमानी पद्धतीने कंत्राटीकरणाच्या माध्यमातून त्या जागा भरु पाहत आहे, ज्याला संघटना म्हणून आम्ही सातत्याने विरोध करीत आलो आहोत व व्यवस्थापनाने कंत्राटीकरणाचे हे नवे प्रारूप जर मागे नाही घेतले तर हा लढा आणखी तीव्र करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या प्रसंगी बँक कर्मचारी संघटनेचे सेक्रेटरी कॉ. दीपक माने, कॉ रेश्मा भवरे, कॉ. सुधीर मोरे, कॉ. महेश घोडके यांचेसह लातूर शहर आणि परिसरातील बहुसंख्य कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी हजर होते.