नवी दिल्ली; वृत्तसंस्था : वैशाख वणवा दिल्लीत अक्षरश: पेटलेला आहे. दिल्लीच्या तापमानाने १०० वर्षांतील विक्रम मोडीत काढले आहेत. राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणासह बिहारमध्येही उष्णतेची लाट कायम आहे. बिहारमधील पाटण्यात बुधवारी दुपारी उष्माघातामुळे वेगवेगळ्या घटनांत मिळून ८० शालेय विद्यार्थी बेशुद्ध पडल्याने एकच खळबळ उडाली!
बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पारा बुधवारी ४८ अंशांच्या जवळपास पोहोचला. आठ जिल्ह्यांतील ८० मुले कडक उन्हामुळे भोवळ येऊन पडली. भर रस्त्यावर, ऑटो रिक्षांमध्ये तसेच अनेक शाळांमध्येही अशा घटना घडल्या. मुलांना तातडीने रुग्णालयांत दाखल करण्यात आले. राज्यात गुरुवारपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार आहे.
राजधानी दिल्लीत तर तापमानाने कहर केला. दुपारपर्यंत उन्हाचा तडाखा अस असाच होता. घराबाहेर पडायलाही कुणी धजत नव्हते. पारा ५२ अंशांच्या पुढे सरकल्यानंतर काही वेळाने काही ठिकाणी झालेल्या पावसाने काहीसा दिलासा मिळाला.