चाकूर : प्रतिनिधी
तालूक्यातील वडवळ नागनाथ येथील बसवेश्वर चौकातून मंदिरकडे जाणा-या रस्त्याच्या दुतर्फा नाल्यांचा उपसा न केल्यामुळे नाल्यातील घाण पाणी घरामध्ये घुसल्याने अनेकांच्या अंगणाला तळ्याचे स्वरूप आले. तसेच मुख्य बाजारपेठ असलेल्या परिसरात नालीचे घाण पाणी मागील आठ दिवसांपासून रस्त्यावरूनच वाहत आहे; याकडेही ग्रामपंचायत दुर्लक्षच करीत असल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सोमवारी दि. २६ रोजी दुपारी आणि मंगळवारी दुपारी शेतशिवारासह गाव परिसरात जोरदार पाऊस झाला. मागील आठवडाभरापासून दररोजच परिसरात जोरदार पाऊस होत असल्याने नागरिकासह शेतक-यांची आता झोप उडाली आहे. वडवळ परिसरात सोमवारी ६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली तर आत्तापर्यंत एकूण ३२८ मिलिमीटर मान्सूनपूर्व पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, येथील राजकुमार हरिश्चद्र आलुरे यांच्या घरात नालीचे घाण पाणी शिरले तर रमाकांत भाजगे यांच्या घराच्या अंगणाला तळ्याचे स्वरूप आले. सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या दमदार पावसाचे पाणी घरावरील पत्र्याच्या पन्हाळात सामावले जात नसल्याने अनेकांच्या घरावरील पत्र्यांना गळती लागली होती.
दरम्यान, येथील ३३ के. व्ही. उपकेंद्राच्या बाजूच्या परिसरात नाल्या नसल्याने सांडपाणी आणि पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात थांबले आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. या परिसरात नेहमीच डेंगू, मलेरिया सारख्या साथीच्या आजारांचे रुग्ण आढळले जातात. या परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायतकडे अनेक वेळा सांडपाण्याची, नाल्यांची सोय करण्याची मागणी करूनही ग्रामपंचायतकडून प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळणार आहे. याकडे ग्रामपंचायतीने वेळीच लक्ष देऊन या परिसरासह पूर्ण गावातील नाल्या वाहत्या करून दुर्गंधी दूर करावी, अशी मागणी होत आहे.