22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeपरभणीपावसाच्या खंडामध्येही तग धरणारे वाण विकसीत करू : कुलगुरू डॉ. इंद्र मणी

पावसाच्या खंडामध्येही तग धरणारे वाण विकसीत करू : कुलगुरू डॉ. इंद्र मणी

परभणी/प्रतिनिधी
विद्यापीठ संशोधनास प्रथम प्राधान्य देते. यातूनच शेतक-यांना महत्त्वपूर्ण शिफारशी आणि तंत्रज्ञान दिले जाते. हे तंत्रज्ञान पश्चिम विभागीय कृषी महामेळाव्याचे आयोजन करून शेतक-यांपर्यंत पोहोचविण्यात यश प्राप्त झाले. पावसाचा मोठा खंड पडला तरी तग धरणारे व शाश्वत उत्पादन देणारे वाण विकसित करण्याचे संशोधन हाती घेण्यासाठी विद्यापीठ शास्त्रज्ञांना सुचित केले‌ असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि आत्‍मा, कृषि विभाग (महाराष्‍ट्र शासन) यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने कृ‍षी तथा शेतकरी कल्‍याण मंत्रालय (भारत सरकार) नवी दिल्‍ली पुरस्‍कृत पश्चिम विभागीय कृषि मेळावा आणि कृषि प्रदर्शनीचे भव्‍य आयोजन दि.२१, २२, आणि २३ फेब्रुवारी रोजी विद्यापीठाच्‍या क्रीडा संकुल प्रागंणात करण्‍यात आले होते. या मेळावाचा समारोप दि.२३ फेब्रुवारी रोजी झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. इन्द्र मणि होते. तर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची विशेष उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी विस्तार (भारत सरकार) सहसंचालक श्रीपाद खळीकर, कार्यकारी परिषद सदस्य भागवत देवसरकर, प्रगतशील शेतकरी चंद्रकांत वरपूडकर, नागपुर येथील विभागीय सेंद्रीय शेती संशोधन केंद्राचे विभागीय संचालक अजय सिंह राजपूत, भारत कुमार देवडा, विजय आगरे, माजी कुलगुरू डॉ. के. पी. गोरे होते. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, संचालक बीजोत्पादन डॉ. देवराव देवसरकर, नियंत्रक प्रवीण निर्मळ, कुलसचिव पि के. काळे, डीआरडीए प्रकल्प संचालक श्रीमती रश्मी खांडेकर, उपसंचालक डॉ. गजेंद्र लोंढे, समन्वयक डॉ. राजेश कदम, मुख्य विस्तार अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना कुलगुरू डॉ. इंद्र मणि म्हणाले, मेळाव्‍याच्‍या निमित्ताने आयोजित प्रदर्शनाच्या दालनातून दोन कम्बाईन हार्वेस्टरसह अनेक शेती व गृह उपयोगी वस्तूंची विक्री झाली असल्याचे सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी गावडे म्‍हणाले की, विद्यापीठात आयोजित करण्‍यात आलेल्‍या प्रदर्शनीचा लाभ होत असुन अनेक शेतकरी बांधव आणि दालनधारकांनी सदर प्रदर्शन एक दिवस वाढण्‍याची विनंती केली. यातच या मेळाव्‍याचे यश लक्षात येते. या प्रकारे वेळोवेळी विद्यापीठाने कृषि प्रदर्शन आयोजित करण्‍याची अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली. सहसंचालक खळीकर म्‍हणाले की, कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांचा दिल्लीतील विविध कार्यक्रमातील अनुभव आणि त्यांनी हाताळलेले मोठे प्रकल्प या अनुभवाचा लाभ परभणी विद्यापीठाला नक्कीच मिळेल अशी अशा व्यक्त केली. माजी कुलगुरू डॉ. गोरे यांनी मराठवाड्यातील शेतक-यांसमोर समस्यांचे डोंगर असताना हे विद्यापीठ योग्य दिशेने कार्य करते. तसेच शेतक-यांना आदराचे स्थान मिळवून देण्याचेही कार्य करत आहे. शेतक-यांनी काळानुरूप व हवामान बदलानुसार आपली पीक पद्धती बदलण्याचे आवाहन केले.

प्रास्ताविक विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. वनिता घाडगे-देसाई यांनी तर आभार मुख्य विस्तार अधिकारी डॉ प्रशांत देशमुख यांनी मानले. सदर कृषि मेळाव्‍यात पश्चिम भारतातील महाराष्‍ट्रासह गुजरात, राजस्‍थान, मध्‍य प्रदेश, छत्‍तीसगड, गोवा, दीव-दमन आणि दादर नगर हवेली इत्‍यादी सहा राज्‍यातील शेतकरी बांधव, कृषी तज्ञ, कृषि संशोधक, कृषि कंपन्‍या, कृषि अधिकारी, कृषि विस्‍तारक आणि कृषि उद्योजक हजारोच्‍या संख्‍येने सहभागी झाले होते. याप्रसंगी प्रदर्शनातील विविध दालनांना मिळालेल्या पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR