जळकोट : प्रतिनिधी
एक जुलैपासून शेतक-यांना आपल्या पिकांच्या नुकसानीसाठी पिक विमा मिळावा म्हणून पिक विमा भरणे सुरू झालेले आहे परंतु सरकारने यावर्षी पिक विमा भरताना फार्मर आयडीची सक्ती केलेली आहे . अद्यापही अनेक शेतकरी फार्मर आयडी काढण्यापासून वंचित आहे यामुळे पिक विमा भरण्यासाठी शेतक-यांवर सातबारा असताना आणखीन फार्मर आयडी कशासाठी असा प्रश्नही शेतकरी उपस्थित करीत आहेत.
जळकोट तालुक्यामध्ये पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ घेणारे १९४१ शेतकरी आहेत . यापैकी जवळपास १२३१२ शेतक-यांनी फार्मर आयडीसाठी नोंदणी केलेली आहे अद्याप जवळपास सहा हजार शेतकरी फार्मर आयडी नोंदणीपासून वंचित आहेत. यामुळे सहा हजार शेतक-यांना पिक विमा भरण्यापासून वंचित राहावे लागणार आहे. तालुक्यातील असे अनेक गावे आहेत की त्या ठिकाणी ६० टक्के पेक्षा कमी फार्मर आयडीची नोंदणी झालेली आहे. यामध्ये बोरगाव, सोनवळा, डोंगरगाव, पाटोदा खुर्द,गव्हाण, एकुरका खुर्द,अतनूर , कोळनुर, मंगरूळ , माळहिपरगा, उमरदरा , मेवापूर ,विराळ , रावणकोळा या गावांमध्ये ६० टक्के पेक्षा कमी नोंदणी झालेली आहे . ही गावे सोडून इतर गावातही २५ ते २० टक्के शेतकरी फार्मर आयडी काढण्यापासून वंचित राहिलेले आहे .
पिक विमा भरताना फार्मर आयडी सक्तीची केल्यामुळे हजारो शेतकरी पिक विमा भरण्यापासून वंचित राहणार आहेत. शेतक-यांच्या ओळखीसाठी आधार कार्ड आहे. या सोबतच शेतक-यांच्या नावावर सातबारा आहे. यासोबतच अनेक स्वघोषणा प्रमाणपत्र आहेत, असे असताना आणखीन फार्मर आयडीचा तगादा कशासाठी असा सवाल आता शेतकरी उपस्थित करत आहेत. फार्मर आयडीची सक्ती करणे म्हणजे शेतक-यांना पिक विमा मिळण्यापासून वंचित ठेवण्यासाठीचा हा उठाठेव असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत . शेतकरी हे संबंधित कंपनीकडे पिक विमा भरत
आहेत परंतु सरकार कशासाठी सक्ती करत आहे. हे देखील शेतक-यांना कळेनासे झाली आहे.