बीड : प्रतिनिधी
‘आतापर्यंत संयमाने घेतले, पण सरकारने १०० टक्के आपली फसवणूक केली.’, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी पुढच्या आंदोलनाबाबत मोठी घोषणा केली. आता मुंबईत २९ ऑगस्ट २०२५ ला आमरण उपोषण होणार असे म्हणत मनोज जरांगेंनी उपोषणाची तारीख देखील सांगितली. मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारने फसवणूक केल्याचे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली.
मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, ‘प्रथम सरकारचे कौतुक आहे. दोन वर्षे झाले तरीही आम्ही संयमाने घेत आहोत. मागील उपोषण सोडताना चार मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी केली जाईल असे सांगितले होते. आज तीन महिने पूर्ण झाले कुठल्याही मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही.
जरांगेंनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर देखील टीका केली. ते म्हणाले की, मराठा आणि कुणबी एकच आहे याचा अध्यादेश काढा. विद्यार्थ्यांनी नेत्यांचे ऐकून शिक्षणात जातिवाद आणू नका. आम्ही जातिवाद करत नाही. सरकारकडे मागणी आहे की सगळे गुन्हे सरसकट मागे घ्या. माझ्यावर हल्ला करायचा. मला मारायचे आहे. आता मी दारात आहे देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या. मी २९ ऑगस्टला तुमच्या दारात येत आहे. तुम्हाला जे करायचे ते करा. मला फक्त २८ ला सोडायला पोरं येतील. २९ ला ते परत जातील. २८ ऑगस्टच्या आधी सगळ्या मागण्या मंजूर झाल्या पाहिजेत. आमच्या संयमाचा अंत बघू नका फडणवीससाहेब.
आंदोलनाची दिशा ठरणार १ ऑगस्ट रोजी
तसेच, ‘सगे सोय-याच्या अधिसूचनेला दीड वर्ष पूर्ण झाले आहे. पुढील आंदोलनाची दिशा १ ऑगस्ट रोजी सांगणार आहे. सरकारने आपली शंभर टक्के फसवणूक केली. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या तुमच्या पाठ झाल्या आहते. यावर सरकारची पीएच.डी झाली आहे. शिंदे समितीने काम केले. आमच्या नोंदी नाहीत म्हणले होते. तुम्ही त्या नोंदी शोधल्या त्यामुळे सरकारचे कौतुक केले. आमच्या कुणबी नोंदी सापडल्या. जो अधिकारी कुणबी प्रमाणपत्र देत नसेल त्याला तात्काळ निलंबित करून टाका, अशी मागणी जरांगेंनी केली आहे.