30.5 C
Latur
Saturday, May 31, 2025
Homeसंपादकीयपेरावं की थांबावं....?

पेरावं की थांबावं….?

‘जगावं की मरावं’ असा प्रश्न ‘नटसम्राटा’ला पडला होता, तशीच काहीशी दोलायमान परिस्थिती सध्या शेतक-याची झाली आहे. शेतीसाठी अनुकूल हवामान अत्यंत आवश्यक असते. मात्र, गत काही वर्षांत हवामानातील अनिश्चिततेमुळे शेतक-यांचे गणित वारंवार चुकत आहे. यंदा तर त्याचा कहर झालेला दिसतो. मे महिन्यात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्याने काही भागात ढगफुटीसदृश पाऊस, गारपीट तर काही भागात वादळवा-याने पिकांचे अतोनात नुकसान केले. हवामानातील या बदलामुळे शेतकरी गोंधळून गेला आहे.

पारंपरिक पद्धतीनुसार मे अखेरपर्यंत शेतकरी पेरणीसाठी मशागतीत मग्न असतो. परंतु यंदा एप्रिल अखेरपासूनच अवकाळी पावसाने थैमान घालण्यास सुरुवात केल्याने शेतक-याला शेतीची मशागत करण्यास वेळच मिळाला नाही. शेतात कमालीचा ओलावा असल्याने नांगरणी करता आली नाही. हवामान खात्याचे अंदाजही अनेकवेळा चुकीचे ठरतात, त्यामुळे अचूक निर्णय घेणे शेतक-यांना अवघड जाते. तो कायम द्विधा मन:स्थितीत असतो. या पार्श्वभूमीवर कृषि विभाग, कृषि विद्यापीठ व सरकारने शेतक-यांना योग्य वेळी अचूक आणि त्या त्या भागातील हवामानानुसार सल्ला देणे ही काळाची गरज आहे. शेतक-यांच्या हतबलतेचा फायदा घेऊन बोगस बियाणे, खते विक्री करणा-या टोळ्याही सक्रिय होतात. सरकारने त्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. तसेच शेतक-यांना विश्वासार्ह मार्गदर्शन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अवकाळी पाऊस केवळ एक हवामान घटक नसून तो शेतक-यांच्या कष्टांवर, भविष्यावर आणि स्वप्नांवर परिणाम करणारा महत्त्वाचा मुद्दा आहे.

सध्या शेतक-यासमोर ‘पेरावं की थांबावं’ असा गहन प्रश्न उभा आहे. त्याचे उत्तर देण्यासाठी हवामानावरील संशोधन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शाश्वत कृषि धोरण राबवायची गरज आहे. ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ ही म्हण आता वापरून गुळगुळीत झाली असली तरी सरकार आणि प्रशासन त्यापासून बोध कधी घेणार हा प्रश्न अनुत्तरितच आहे. देशाची आर्थिक राजधानी आणि जागतिक दर्जाच्या शहरातील सर्व सेवा-सुविधा पहिल्याच पावसात कोलमडून पडत असतील तर असे का होते आणि याला जबाबदार कोण? हा प्रश्न उपस्थित होतो. कोट्यवधी रुपये खर्च करूनही मुंबईतील नालेसफाई झालीच नाही. फक्त या कामाची पाहणी करून फोटो काढले गेले. पण ही कामे कशी होतात, त्यात किती भ्रष्टाचार होतो हे कॅमे-यात कैद झालेच नाही. पावसावरून सत्ताधारी व विरोधकांत राजकारण सुरू होते. भाजप आणि शिंदे गट मुंबई महानगरपालिकेत २५ वर्षे सत्तेत असणा-या शिवसेनेला (उबाठा) दोष देत आहेत. पण ज्यावेळी ते सत्तेत एकत्र होते, तेव्हा गप्प का होते? मुंबई महापालिकेवर प्रशासन असो की राजकीय पक्षाची सत्ता, मुंबईकरांचे हाल होणे काही थांबत नाही. २६ जुलै २००५ रोजी आलेल्या पुराचा भयानक अनुभव अजूनही ताजा आहे.

परंतु त्यापासून सरकार आणि प्रशासनाने काहीच बोध घेतलेला नाही. दरवर्षी पर्जन्यवृष्टी एक नवीन धडा शिकवून जाते, पण त्यातून सरकार आणि प्रशासन काही बोध घेताना दिसत नाही, ते कधी दिसेल? राज्यात यंदा मान्सूनने १२ दिवस आधीच हजेरी लावली. उत्तर महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला. गत ४-५ दिवसांपासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडत आहे. २६ मे रोजी मान्सून राज्यात दाखल झाल्यानंतर आता तो सर्वच भागात पसरला आहे. पुढील काही दिवसांतील पावसाच्या प्रवासाबाबत पुणे वेधशाळेने म्हटले आहे की, बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता उत्तरेला सरकल्यामुळे महाराष्ट्रात पुढील पाच ते सहा दिवसांत पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. ३० मे नंतर मान्सूनचा प्रवास ओसरण्याची शक्यता आहे. नागपूर वेधशाळेने म्हटले आहे की, दोन दिवसांत पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र, ३० मे नंतर पावसाचा जोर कमी होऊ शकेल. पुढील दोन दिवसांत पावसाचा प्रवास थंडावणार असल्यामुळे शेतक-यांनी पेरणीची घाई करू नये. १०० मिमी पाऊस होईपर्यंत शेतक-यांनी पेरणी करू नये, असे हवामान विभागाने म्हटले आहे. यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळेल असा अंदाज आहे.

यावेळी ११० टक्क्यांच्या जवळपास पावसाचे प्रमाण राहू शकते, तसेच देशाच्या दक्षिण आणि मध्य भागात अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. पहिल्याच पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांत मोठे नुकसान केले आहे. आता मान्सून मराठवाडा आणि विदर्भात पोहोचला आहे. दोन्ही भागात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे. पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचे आहेत. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मान्सूनपूर्व पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. मुंबई, कोकण, नगर, पुणे, नाशिक या भागात पावसाचे प्रमाण जास्त राहील. बाकी विभागात १ ते ६ जूनपर्यंत सूर्यदर्शन होईल. त्यावेळी शेतक-यांनी नांगरणी, वखरणीची कामे उरकून घ्यावीत आणि पुढे जमिनीत पुरेसा ओलावा आल्यानंतरच पेरणीचा निर्णय घ्यावा असे हवामान अभ्यासकांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात ३० मे पासून पुढील पाच ते सहा दिवस मोसमी वा-यांचा वेग मंदावणार आहे.

वा-यांचा प्रवास अतिशय मंदगतीने होत राहील. त्यामुळे राज्यात काही दिवस पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. पावसात सातत्य राहणार की खंड पडणार याकडे सध्या शेतक-यांचे लक्ष आहे. कृषि विभागाने मात्र पेरणीची घाई करू नये असा सल्ला दिल्याने गोंधळ वाढला आहे. राज्याच्य कृषि विभागाने यंदा मोसमी पावसाचा हंगाम लवकर सुरू झाला असला तरी पेरणीची घाई करू नये असा सल्ला दिला आहे. याचा अर्थ पावसाचा खंड पडू शकतो. खरीप हंगामासाठी एप्रिलमध्ये तयारी सुरू होते. परंतु यंदा या कालावधीतच पाऊस सुरू झाल्याने शेतक-यांना मशागतीची संधीच मिळाली नाही. साधारण पेरणीलायक पाऊस हा विदर्भात १३ जून, मराठवाड्यात २१ जून आणि उत्तर महाराष्ट्रात १७ जूनपासून अपेक्षित आहे. त्यामुळे सध्या जगाच्या पोशिंद्यासमोर ‘पेरावं की थांबावं’ असा प्रश्न आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR