लातूर : प्रतिनिधी
जिल्हयात गेल्या वर्षी पावसाळयात सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाला असला तरी आज घडीला नागरीकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. मे महिण्यात दरवर्षी भूजल पातळी घसरल्याचे पाहायला मिळते. यावर्षी मे महिण्यात अवकाळी पाऊस पडल्याने गेल्या पाच वर्षाच्या तलुनेत प्रथमत:च मे महिण्यात मान्सून पूर्व भूजल पातळीत ०.३९ मिटरने वाढ झाली आहे.
लातूर जिल्हयात सरासरी ७९१.६० मिमी पाऊस पडतो. तो गेल्यावर्षी सरासरीच्या १११ टक्के झाला होता. त्यामुळे जिल्हयात मार्च महिण्याच्या मध्यपर्यंत पाणी टंचाई जानवली नाही. मार्चच्या मध्यानंतर मात्र जिल्हयातील ग्रामीण भागातील नागरीकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आसून ५८ गावे, १४ वाडयांना ८४ अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मे महिण्यात अवकाळी पाऊस पडल्याने ११५ च्यावर पोहचलेली अधिग्रणाची संख्या आता ८४ च्यावर आली आहे. अवकाळी पावसाने कांही प्रमाणात का होईना पाणी टंचाईवर मात केली आहे. दरवर्षी मे मध्ये ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे सार्वजीनक बरोबरच खाजगीही स्त्रोत बंद पडतात त्यामुळे ग्रामीण भागातील नागरीकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. यावर्षी अवकाळी पावसाने सर्व उलटेच घडले आहे.
लातूर जिल्हयातील १०९ जुन्या शिवकालीन विहिरींचे वरिष्ठ भूवैज्ञानिक विभागाच्या टिमकडून जानेवारी, मार्च, मे आणि ऑक्टोबर महिण्यात भूजल पातळीचे निरीक्षण करण्यात येते. त्यानुसार मे अखेर जिल्हयात मान्सून पूर्व भूजल पातळीची तपासणी लातूरच्या वरिष्ठ भूवैज्ञानिकांच्या टिमनी केली असता जिल्हयाच्या भूजल पातळीत गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत ०.३९ मिटरने वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.