मुंबई : प्रतिनिधी
लोकल ट्रेन्समधील वाढती गर्दी याचे मुख्य कारण असल्याचे सर्वज्ञात आहे. तरीही, असे अपघात घडल्यानंतर प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही. केंद्रीय रेल्वे प्रशासनाने या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घ्यायला हवी अशी टीका राष्ट्रवादी शप गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिवा-मुंब्रा येथील घटनेवर केली आहे.
दरम्यान, सोमवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून ८ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली.या घटनेबाबत शरद पवार यांनी तसेच काही उपाययोजनाही सुचवल्या.
मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. सर्व निष्पाप प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच, काही प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्याही प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो. मध्य रेल्वेवर दररोज सरासरी ६ ते ७ प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू होतो. एका आकडेवारीनुसार समोर आलेली ही माहिती अत्यंत चिंताजनक आहे, असे पवार म्हणाले.
मध्य रेल्वेनेही वेळेचे उत्तम नियोजन करून त्यानुसार महत्वांच्या मार्गांवर लोकल फे-या वाढवणं गरजेचं आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात. वारंवार होणा-या अशा अपघातांना आळा घालण्यासाठी लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याच्या निर्णयाची विहित वेळेत अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे, असे त्यांनी सुचवले.