मुंबई :वृत्तसंस्था
‘छावा’ सिनेमानंतर ‘फुले’ सिनेमा वादाच्या भोव-यात अडकला आहे. त्यामुळेच महात्मा फुले जयंतीला प्रदर्शित होणार असलेला हा सिनेमा पुढे ढकलण्यात आला. आता ‘फुले’ सिनेमा ११ एप्रिल रोजी नाही तर, २५ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमावर आता राजकीय व्यक्ती देखील स्वत:ची भूमिका मांडताना दिसत आहेत. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ‘फुले’ सिनेमावर स्वत:चे मत मांडले आहे. सर्वत्र संजय राऊत यांच्या वक्तव्याची चर्चा सुरू आहे.
‘फुले’ सिनेमावर आरएसएसचा दबाव असल्याचे सांगितले जात आहे. ज्यामुळे सिनेमा प्रदर्शित होण्यात अडचणी येत आहेत असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. यावर राऊत म्हणाले, ‘आमच्या पक्षाची एक भूमिका आहे. कालच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझे बोलणे झाले आहे. महात्मा ज्योतिबा फुले देशाचे एक असे महात्मा होते, ज्यांनी देशाच्या सामाजिक सुधारणेसाठी पुढाकार घेतला.
पुढे संजय राऊत म्हणाले, ‘महिलांना शिक्षणाचा अधिकार देण्यासाठी असंख्य संकटांचा सामना फुले यांनी केला. आता सिनेमात जे काही दाखवले आहे, ते खोटं तर नाही. तेव्हा जे काही झाले होते ते सर्व रेकॉर्डमध्ये आहे. महाराष्ट्र सरकारने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर जे वाङ्मय प्रसिद्ध केले आहे, त्यामध्ये सर्वकाही आहे. सरकारी पुस्तकांमध्ये सर्वकाही आहे. तेच सिनेमात दाखवले आहे. तर सेन्सॉर बोर्ड येथे कुठून आले? असा प्रश्न देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला.
सरकारने सिनेमाच्या बाजूने उभे राहायला हवे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिनेमाची बाजू घ्यायला हवी. ज्योतिबांचा बचाव केला पाहिजे. मी असं म्हणालो तर म्हणतील ही मूर्खता आहे. फुलेंच्या विचारांची रक्षा करायला हवी. मी असे म्हणालो तर, ते त्यांना आवडणार नाही. कारण ते एका विचारसणीचे लोक आहेत जे सत्तेत आहेत. ‘फुले’ सिनेमातील काही सीन आम्ही पाहिले आहेत आणि जे सत्य आहे तेच सिनेमात दाखवण्यात आले आहे.’ असे देखील संजय राऊत म्हणाले आहेत.