क्वेट्टा : वृत्तसंस्था
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेट्टा येथे बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने केलेल्या हल्ल्यात १० पाकिस्तानी सैनिक ठार झाले. बीएलएने शुक्रवारी एक निवेदन जारी करून हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. बीएलएने म्हटले आहे की, त्यांच्या बंडखोरांनी रिमोट कंट्रोल्ड आयईडीने पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्याला लक्ष्य केले. हा हल्ला आपल्या स्वातंत्र्यलढ्याचा एक भाग आहे.
क्वेट्टाजवळील मार्गट चेकपोस्टजवळ लष्करी ताफ्याला लक्ष्य करण्यात आले. गेल्या महिन्यात बलुच लिबरेशन आर्मीने जाफर एक्सप्रेसवर हल्ला करून तिचे अपहरण केले होते. ट्रेनमध्ये सुमारे ४५० प्रवासी होते. बीएलएने तुरुंगात असलेले बलुच कार्यकर्ते, राजकीय कैदी, बेपत्ता व्यक्ती, अतिरेकी आणि फुटीरतावाद्यांची बिनशर्त सुटका करण्याची मागणी केली होती. यानंतर, पाकिस्तानी सैन्य आणि बलुच सैनिकांमध्ये ४८ तासांची लढाई सुरू झाली. पाकिस्तानी सैन्याने दावा केला की ३३ बलुच सैनिक मारले गेले आणि सर्व ओलिसांना सोडण्यात आले. तर बलुच सैनिकांनी १०० पाकिस्तानी सैनिकांना मारल्याचा दावा केला.
दहशतवाद निर्देशांकात पाकिस्तान दुसरा
सिडनीस्थित इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीसने जारी केलेल्या ग्लोबल टेररिझम इंडेक्स अहवाल २०२५ मध्ये, जगातील दुस-या क्रमांकाचा सर्वाधिक दहशतवादग्रस्त देश म्हणून पाकिस्तानचे वर्णन केले आहे. या अहवालात सलग दुस-या वर्षी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानला सर्वात धोकादायक दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे.