तामिळनाडूमध्ये होणारा बहुचर्चित नव्या सरकारचा शपथविधी समारंभ लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. ‘टीव्हीके’ पक्षाचे प्रमुख विजय यांनी सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी ‘लोकभवन’ येथे राज्यपालांची भेट घेतली आणि विधानसभेच्या ११३ आमदारांच्या पाठिंब्याची पत्रे सादर केली. या पाठिंब्याच्या पत्रावर टीव्हीकेच्या १०७ आणि काँग्रेस पक्षाच्या ५ आमदारांच्या स्वाक्ष-या आहेत. परंतु राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय यांच्याकडे ११८ आमदारांच्या पाठिंब्याच्या पत्रांची मागणी केली. राज्यपालांच्या या निर्णयामुळे हा सोहळा पुढे ढकलला जाऊ शकतो. विजय यांनी आवश्यक असलेल्या आमदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी अतिरिक्त वेळेची विनंती राज्यपालांना केली असल्याचे कळते. दरम्यान चेन्नईतील नेहरू स्टेडियममध्ये शपथविधीची जय्यत तयारी सुरू असून, काँग्रेस नेते राहुल गांधी या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तामिळनाडूच्या २३४ सदस्यांच्या विधानसभेत टीव्हीकेकडे १०८ जागा आहेत.
विजय यांनी दोन मतदारसंघांतून विजय मिळवल्यामुळे त्यांना एक जागा रिक्त करावी लागेल. त्यामुळे पक्षाच्या आमदारांची एकूण संख्या १०७ होईल. राज्यात एकूण जागांची संख्या २३३ असली तरी बहुमताचा आकडा हा ११८च असणार आहे. परिणामी टीव्हीकेला आणखी ११ आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. सध्या काँग्रेसच्या ५ आमदारांचा पाठिंबा मिळाला असला तरी आणखी ६ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. अन्य पक्षांमध्ये व्हीसीके, मार्क्सवादी कम्युनिस्ट, भारतीय कम्युनिस्ट तसेच मुस्लिम लीग यांचे प्रत्येकी दोन तर डीएमडीकेचा एक आमदार आहे. या पक्षांनी विजय यांना पाठिंबा देण्यासाठी अनुकूलता दर्शवली असली तरी रात्री उशिरापर्यंत त्यांनी पत्र दिले नव्हते. दरम्यान अण्णाद्रमुकमध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात असून २० आमदार विजय यांच्यासोबत जातील अशी चर्चा आहे. तामिळनाडूच्या राजकीय इतिहासात २०२६ ची विधानसभा निवडणूक एका मोठ्या सत्तांतराची साक्षीदार ठरली आहे. अनेक दशकांपासून द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन प्रमुख पक्षांभोवती फिरणारे तामिळनाडूचे राजकारण आता एका नव्या वळणावर येऊन ठेपले आहे.
सुपरस्टार विजय थलपती यांच्या ‘तमिलगा वेत्री कळघम’(टीव्हीके) या पक्षाने राजकीय समीकरणे मोडीत काढत विधानसभेत १०८ जागांसह सर्वांत मोठा पक्ष म्हणून झेप घेतली. मात्र, विजयचा हा आनंद सत्तास्थापनेच्या उंबरठ्यावर येऊन काहीसा विरळ होताना दिसत आहे. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी बहुमताच्या आकड्यावरून तांत्रिक अडसर निर्माण केला आहे. बहुमतासाठी अद्याप सहा आमदारांची कमतरता भासत असल्याने राजभवनाने सावध पवित्रा घेतला आहे. या सर्व राजकीय संघर्षात अण्णाद्रमुक पक्षात मोठी खळबळ माजली आहे. पक्षाच्या एकूण ४७ आमदारांपैकी २८ आमदारांना पुद्दुचेरी येथील एका रिसॉर्टवर हलवण्यात आले आहे. माजी मंत्री षण्मुगम यांच्या नेतृत्वाखाली अण्णाद्रमुकचा एक मोठा गट विजय यांना पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे. अण्णाद्रमुकचे सुमारे ३० आमदार पक्षाबाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. तसे झाल्यास विजय यांचा बहुमताचा मार्ग सुकर होऊ शकतो. ही भीती लक्षात घेऊनच पक्षाने आपल्या आमदारांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. सध्याच्या परिस्थितीत जोपर्यंत विजय थलपती अतिरिक्त आमदारांचा पाठिंबा मिळवून राज्यपालांची खात्री पटवून देत नाहीत,
तोपर्यंत तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स कायम राहणार आहे. विजयने राज्यपालांना आपण बहुमत चाचणीसाठी तयार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान राज्यपालांना आदेश देण्यासंदर्भात आपण न्यायालयात जाऊ शकतो असे टीव्हीकेने म्हटले आहे. तामिळनाडूत महाराष्ट्राप्रमाणे ‘मविआ’ पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होती. परंतु निकालानंतर मुख्यमंत्रिपदावरून मतभेद झाल्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली होती. तामिळनाडूच्या राजकारणात आलटून-पालटून वर्चस्व गाजवणा-या द्रमुक पक्षाला ६० तर अण्णाद्रमुकला ४७ जागा मिळाल्या आहेत. दोघांची बेरीज १०७ होते. दरम्यान काँग्रेसने टीव्हीकेला पाठिंबा दिल्याने द्रमुक पक्ष नाराज आहे. काँग्रेसचे पाच आमदार टीव्हीकेकडे गेल्याने द्रमुकसमोर इतर छोट्या पक्षांना सोबत घेण्याचे आव्हान आहे. परंतु द्रमुक आणि अण्णाद्रमुक एकमेकांचे कट्टर शत्रू असल्याने ही शक्यताही कमी आहे. तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीत विजयने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला एवढे मात्र खरे. काँग्रेसने धर्मनिरपेक्ष पुरोगामी राजकारणासाठी टीव्हीकेला पाठिंबा दिल्याचे म्हटले आहे.
शिवाय ही युती फक्त सरकार स्थापनेसाठी नसून स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि राज्यसभेसाठीही असल्याचे म्हटले आहे. यावरून इंडिया आघाडीत फूट पडली आहे. कारण द्रमुक आणि काँग्रेसने आघाडी करत ही निवडणूक लढवली होती. त्यामुळे ज्या टीव्हीकेविरुद्ध तुम्ही लढला, त्यांनाच पाठिंबा कसा देऊ शकता अशी टीका द्रमुकने केली आहे. टीव्हीकेला सत्ता स्थापनेसाठी अन्य छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांना सोबत घ्यावे लागेल. दुसरा पर्याय म्हणजे द्रमुकबरोबर युती. पण टीव्हीकेने द्रमुकविरुद्ध आक्रमक प्रचार केला होता. तिसरा पर्याय म्हणजे अण्णाद्रमुकला सोबत घेणे अथवा बाहेरून पाठिंबा मागणे. परंतु हे ही शक्य दिसत नाही. कारण असे केल्याने राज्याला स्थिर सरकार मिळणार नाही. चौथा पर्याय म्हणजे एखाद्या पक्षाच्या ३२ सदस्यांनी वॉक आऊट केले तर बहुमतासाठीची संख्या कमी होऊ शकते. या मार्गाने सरकार स्थापन झाले तर सरकारवर अल्पमताची टांगती तलवार कायम राहील एकंदरीत बहुमतासाठीची जुळवणी अवघडच दिसते.
















