बीड : प्रतिनिधी
बीडमधील गावात लहान पोरं हातात बंदूक घेऊन फिरत असल्याचे अनेक फोटो समोर येत आहेत. हे सगळे लोक एकाच गँगचे नाव घेत आहेत. त्यांचा आका धनंजय मुंडे या गुन्हेगारांचा सरदार आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. बीडचा तपास पूर्ण होईपर्यंत एकही मुंडे सत्तेत नको अशी संजय राऊत यांनी मोठी मागणी केली आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले. या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांची उचलबांगडी केली. त्यानंतर नवनीत कॉवत यांची बीडचे नवीन पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. या हत्येमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या घटनेने बीड जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले होते. त्यातच आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे असणारे वाल्मीक कराड हे यामागचे खरे सूत्रधार असल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावक-यांकडून केला जात आहे.
आता यावरून खासदार संजय राऊत यांनी मागणी केली आहे. संजय राऊत यांनी नुकताच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना बीडमधील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांचे नाव घेत थेट टीका केली. बीडमध्ये गेल्या वर्षभरात ३८ खून झाले. बीडमधील गावात लहान पोरे हातात बंदूक घेऊन फिरत असल्याचे अनेक फोटो समोर येत आहेत. हे सगळे लोक एकाच गँगचे नाव घेत आहेत. त्यांचा आका धनंजय मुंडे या गुन्हेगारांचा सरदार आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.
पोलिसांना सहकार्य करा
ज्यांच्यावर आरोप आहे, त्यांच्यावर कारवाई होत नसेल तर त्याला जबाबदार या राज्याचे गृहमंत्री आहेत. गृहमंत्री दुबळे आहेत. कमजोर आहेत. गृहमंत्री नाकाने कांदा सोलत आहेत. कोणाला सोडणार नाही कितीही मोठा असू द्या, तरी तो तुमच्या पदराखाली आणि तुमच्या खिशात आहे. मग तो जवळचा तुमचा कोणी असेल, त्याला फाशीच्या तख्तापर्यंत पोहोचवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा, असेही चॅलेंज संजय राऊतांनी केले.