25.8 C
Latur
Tuesday, July 2, 2024
Homeमहाराष्ट्रभक्तांना अल्पदरात मिळणार नाश्ता, भोजन!

भक्तांना अल्पदरात मिळणार नाश्ता, भोजन!

पंढरपूर : प्रतिनिधी
विठ्ठल भक्तांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी मंदिर समितीने जोरदार तयारी सुरू केली असून, भक्तनिवासांमध्ये भाविकांना अल्पदरात नाश्ता आणि भोजन मिळणार आहे. त्यासाठी मंदिर समितीने हॉटेल ताब्यात घेतले आहे. जास्त दर लावून भाविकांची लूट होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यानंतर मंदिर समितीने आता हे हॉटेल स्वत:कडे चालवायला घेतले आहे. त्यामुळे भक्तनिवासात येणा-या भाविकांना आता अल्पदरात नाश्ता आणि भोजनाची सोय होणार आहे.

विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला येणा-या भाविकांना सर्वात चांगली सुविधा देण्यासाठी मंदिर समितीने उभारलेले विविध भक्तनिवासमध्ये राहण्यासाठी भाविकांचा ओढा असतो. अतिशय भव्य स्वरुपात उभारलेल्या या विविध भक्तनिवासांमध्ये असलेल्या ३६४ रुममध्ये जवळपास रोज १५०० भाविक निवास करू शकतात. अतिशय आलिशान पद्धतीने उभारलेले नवीन भक्त निवास तर भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र असते. या भक्त निवासात देशभरातून येणा-या भाविकांना चांगल्या प्रतीचा चहा, नाश्ता, भोजन मिळावा, यासाठी या हॉटेलचा ठेका देण्यात आला होता. मात्र, जास्त दर लावून भाविकांची लूट होत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर समितीने आता हे हॉटेल स्वत:कडे चालवायला घेतले आहे.

कालपासून याची सुरुवात झाली असून भाविक येथील अल्पदरात मिळणा-या आणि चांगल्या प्रतीच्या खाद्यपदार्थावर खुश असून मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड सर्व सुविधांकडे लक्ष ठेवून आहेत. यासाठी मंदिर समितीने येथे येणा-या देशभरातील भाविकांना चहा, कॉफी, दूध आणि नाश्त्याच्या दरात निम्म्याने कपात केली असून जेवणाची थाळी तर केवळ १०० रुपयात ठेवल्याने भाविकांच्या खिशाला कात्री लागणे बंद होणार आहे.

आषाढी वारीचा सोहळा जवळ आला आहे. त्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात भाविक दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. सध्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ््याने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवले आहे. या पालखी सोहळ््याबरोबर लाखो वारकरी आहेत. सर्व वारकरी हरिनामाच्या गरजात तल्लीन असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर प्रशासनदेखील सतर्क झाले आहे. आषाढी वारी सोहळ््याची संपूर्ण तयारी प्रशासनाने केली आहे. जेणेकरुन पंढरीत येणा-या भाविकांनी कोणताही त्रास होणार नाही. याची विशेष काळजी घेण्यात येत आहे.

भक्तनिवासात वर्षात
येतात ३ लाख भाविक
या भक्तनिवासमध्ये वर्षभरात देशभरातून ३ लाखांपेक्षा जास्त भाविक निवासासाठी येत असतात. आता मंदिर समिती या भाविकांना चांगल्या प्रतीचे खाद्यपदार्थ अतिशय अल्पदरात देणार आहे. त्यामुळे येथे येणा-या भाविकांची अत्यंत कमी दरात नाश्ता आणि जेवणाची सोय होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR