लखनौ : योग्य प्रतिनिधित्व देऊनही मुस्लिम समाजाने आम्हाला साथ दिली नाही, अशा परिस्थितीत भविष्यात काळजीपूर्वक विचार करूनच त्यांना तिकिट दिले जाईल, असे वक्तव्य बहुजन समाज पक्षाच्या सुप्रीमो मायावती यांनी केले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षाच्या झालेल्या मोठ्या पराभवानंतर मायावती यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
लोकसभा निवडणुकीत बसपाला आपले खातेही उघडता आले नाही. यावर विचारले असता त्या म्हणाल्या की, निवडणुकीत झालेल्या नुकसानीबाबत आम्ही सखोल विश्लेषण करू आणि देशातील करोडो गरीब, दलित, शोषित, आदिवासी, मागासलेल्या आणि धार्मिक अल्पसंख्याकांसाठी काम करत राहू, जेणेकरून त्यांच्या सुरक्षेला आणि प्रतिष्ठेला धोका निर्माण होणार नाही, असेही मायावती यांनी म्हटले.
यावेळी बसपाने लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला होता. मंगळवारी जाहीर झालेल्या निकालात बसपाला राज्यातील ८० जागांपैकी एकही जागा जिंकता आली नाही. त्याचवेळी भाजपने ३३, सपा ३७, काँग्रेस ६, आरएलडी २, आझाद समाज पक्ष १ आणि अपना दल (एस) एक जागा जिंकली आहे. याआधी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत बसपाला
एकही जागा जिंकता आली नव्हती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बसपाला राज्यात १० जागा जिंकण्यात यश आले होते. मात्र, त्यावेळी सपा, बसपा आणि आरएलडीची युती होती.