लातूर : प्रतिनिधी
अतिवृष्टीने संपूर्ण लातूर शहरात हाहाकार उडाला होता. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमधील नाल्या तुंबल्या होत्या. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी तातडीने संबंधीत यंत्रणेला सूचना केली आणि भाजीपाला मार्केटमधील नालेसफाईचे काम पुर्ण झाले. त्यामुळे व्यापा-यांनी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचे आभार मानले.
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केट आवारात नाल्या तुंबल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती. नाल्यांमधील कचरा आणि घाण पाणी बाहेर आल्यामुळे भाजी मार्केटमध्ये येणा-या नागरिक आणि व्यापा-यांना पाण्याचा निचरा होत नसल्याने मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या समस्येबाबत भाजी मार्केटमधील व्यापारी श्रीकांत ठोंबरे, काशिनाथ झांबरे, अस्लम बागवान, इरफान बागवान आणि सय्यद नूरअली यांनी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांना माहिती दिली. ही बाब निदर्शनास येताच आमदार देशमुख यांनी तात्काळ लातूर महानगरपालिका आणि बाजार समिती प्रशासनाला सूचना केल्या.
त्यांच्या निर्देशानुसार, स्वच्छता विभागाची यंत्रणा कामाला लागली आणि जेसीबीच्या साहाय्याने लातूरच्या भाजीपाला मार्केटमधील सर्व नाल्यांची साफसफाई एका दिवसात पूर्ण करण्यात आली. या तातडीच्या कार्यवाहीमुळे पाणी तुंबण्याची समस्या दूर झाली आणि परिसरातील अडचण कमी झाली. याबद्दल भाजीपाला मार्केटमधील लहान-मोठे व्यापारी आणि भाजीपाला विक्रेते यांनी माजी मंत्री आमदार अमित देशमुख, मनपा प्रशासन आणि लातूर बाजार समितीचे आभार मानले. यावेळी बाजार समितीचे प्रभारी सचिव अरविंद पाटील, सहाय्यक सचिव सतीश भोसले, ओवरसीअर दर्शन भोसले यांच्यासह मनपा आणि बाजार समितीचे संबंधित कर्मचारी उपस्थित होते.