30.5 C
Latur
Saturday, May 31, 2025
Homeमहाराष्ट्रभाजीपाल्याला महागाईची फोडणी?

भाजीपाल्याला महागाईची फोडणी?

- मुसळधार पावसाचा शेतपिकांना फटका - कांदा-टोमॅटोची आवक घटली

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात दोन आठवड्यांआधीच मान्सून दाखल झाला आणि राज्यात दाणादाण उडाली. अनेक भागांत पाणी साचले होते तर अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या पावसामुळे हजारो हेक्टरवरची पिके उद्ध्वस्त झाली. पावसाचा शेतक-यांना मोठा फटका बसला आहे. आता सर्वसामान्यांनाही याचा फटका बसणार आहे. कारण पावसामुळे भाजीपाला, टोमॅटोसह कांदा नष्ट झाला असून पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे भाज्यांचे दर वाढतील अशी भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, राज्यात पावसाने थैमान माजवले असून पावसाचा सर्वाधिक फटका अमरावती, जळगाव, बुलडाणा आणि अहिल्यानगर, नाशिक, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यांना बसला आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यात ३ हजार २३० तर सोलापूर जिल्ह्यात १२५२ हेक्टरवरील पिके नष्ट झाली आहेत. पुण्यात ६७६ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे.

मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे आंबा, केळी, डाळिंब आणि भाजीपाल्यांना फटका बसला आहे. सोलापुरात केळी, आंबा आणि डाळिंब फळांना फटका बसला आहे. तर कांदा लिंबू, ज्वारी आणि मुगाचे पीक नष्ट झाले आहे.
या पावसाचा सर्वाधिक फटका अमरावती जिल्ह्याला बसला आहे. अमरावतीतील १२ हजार २९५ हेक्टरवरची पिकं नष्ट झाली आहेत. त्यानंतर जळगाव ४ हजार ५३८ हेक्टर, बुलडाणा ४ हजार ३ हेक्टर, जालना १७२६ हेक्टर आणि अहिल्यानगरमध्ये ११५६ हेक्टरवरील पिकं नष्ट झाली आहेत.

कांदा, टोमॅटो महागला
पावसामुळे पुण्यातील कृषि उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे भाज्यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. काल एक किलो टोमॅटोची किंमत ५ रुपये होती. आज एक किलो टोमॅटोला २० ते २५ रुपये मोजावे लागत आहेत.

टॉमेटो सडला
पुणे जिल्ह्यात जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूरसह अहिल्यानगर येथील पारनेर, संगमनेर तालुक्यांमध्ये उन्हाळी टोमॅटोची मोठी लागवड होत असते. तसेच कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर पुणे जिल्ह्यात घेतले जाते. पावसामुळे टोमॅटोच्या शेतात पाणी साठून राहिल्याने मूळकूज सुरू झाली आणि पिकांची वाढ खुंटली आहे. तर टोमॅटोला चिरा जाऊ लागल्या आहेत.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR