पुणे : प्रतिनिधी
वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे दैनंदिन बाजारात भाजीपाल्याची आवक घटली असल्याने दर वाढले आहेत. वाढत्या उन्हामुळे भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाल्याचे जाणवत आहे. त्यामुळे भाजीपाल्याची मागणी देखील घटल्याचे चित्र आहे. कडक ऊन असल्याने सरबत आणि रसवंतीगृहं गजबजू लागली आहेत. गृहिणींकडून लिंबांची खरेदी देखील वाढली आहे.
आवकच्या तुलनेत लिंबांना मागणी वाढल्याने आठवडाभरात लिंबाच्या भावात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारातही चढ्या भावाने लिंबाची विक्री होत आहे. दर्जानुसार लिंबाच्या नगाची विक्री ३ ते ७ रुपये भावाने होत आहे. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात सध्या दररोज ८०० ते १००० गोणी लिंबांची आवक होत आहे. यंदा लसूण, फ्लॉवर, कोबी व शेवग्याच्या दरात किंचित घट झाली आहे. मात्र, हिरव्या मिरच्या आणि लिंबाची आवक घटल्याने त्यांचे दर वाढले आहेत.
भाव आणखी वाढण्याची शक्यता
आवक मंदावल्याने आगामी काही दिवसांत भाजीपाल्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवीन हंगामाचा माल बाजारात येईपर्यंत अशीच परिस्थिती कायम राहू शकते.