पुणे : भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ सारख्या योजनांमुळे देशातील उत्पादकतेला बळ मिळून ती स्वयंभू बनत आहे. पूर्वी चिनी उत्पादनांची हार्डवेअर मार्केटवर मोनोपॉली असल्याचे चित्र होते. परंतु कोरोनानंतर परिस्थिती बदलली आहे. तरी देखील भारतात सॉफ्टवेअरप्रमाणे हार्डवेअर क्षेत्रातही क्रांती आवश्यक आहे, असे मत ‘इन्फोसिस पुणे’चे वरिष्ठ उपाध्यक्ष मृत्युंजय सिंग यांनी मांडले.
ते एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणेच्या संत श्री ज्ञानेश्वर महाराज विश्वशांत डोम येथे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची इनोव्हेशन सेल व एआयसीटीईद्वारे आयोजित राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉन (एसआयएच) स्पर्धेच्या हार्डवेअर गटाच्या अंतिम फेरीच्या उद्घाटन समारंभात बोलत होते.
यावेळी, ‘एज्युमेटिका’चे संस्थापक संजीव कुमार, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. मोहित दुबे, डॉ. रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, नोडल केंद्रप्रमुख डॉ. रेखा सुगंधी, डॉ. सुरेश कापरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तसेच, भारत सरकारकडून दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आलेल्या उद्घाटनात एआयसीटीईचे चेअरमन टी. जी. सीतारामन यांनी देखील मार्गदर्शन केले.
स्पर्धेच्या आयोजनात कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश कराड, डॉ. सुनीता कराड यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेत आंध्र प्रदेश, बिहार, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पाँडेचेरी, कर्नाटक, केरळ, चंदिगढ, जम्मू-काश्मीर, राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यांतील २७ संघांचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत.