नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताने बांगलादेशातून आयात होणा-या ४२ टक्के वस्तूंवर बंदी घातली आहे. यामुळे बांगलादेशला अंदाजे ७७० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजे सुमारे ६६ हजार कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हनुसार हे दोन्ही देशांच्या आयातीच्या सुमारे ४२ टक्के आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाच्या निर्देशांनंतर जारी केलेल्या या बंदीमुळे भारत आता बांगलादेशातून काही वस्तू कमी प्रमाणात आयात करणार आहे.
या निर्णयामुळे आता बांगलादेशातून फक्त तयार कपडे, प्रक्रिया केलेले अन्न आणि प्लास्टिकच्या वस्तू यासारख्या वस्तू काही विशिष्ट बंदरांमधून भारतात येऊ शकतील. काही वस्तूंची जमिनीवरून भारतात पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये बांगलादेशातून दरवर्षी आयात होणारे सुमारे ६१८ दशलक्ष डॉलर किमतीचे तयार कपडे आता फक्त कोलकाता आणि नवा शेवा बंदरांमधूनच येऊ शकतील. पूर्वी हे कपडे जमिनीच्या मार्गानेही भारतात आणले जात होते. अशा परिस्थितीत बांगलादेशच्या भारतातील कपड्यांच्या निर्यातीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
बांगलादेशची चीनशी वाढती मैत्री पाहून भारताने हे पाऊल उचलल्याचेही अहवालात म्हटले आहे. अलीकडेच बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी चीनचा दौरा केला होता. तिथे जाऊन त्यांनी भारताच्या पूर्वेकडील सात राज्ये, ज्यांना सेव्हन सिस्टर्स म्हणतात, ते भूपरिवेष्टित आहेत आणि त्यांना समुद्रात प्रवेश नाही. या संपूर्ण प्रदेशासाठी आपणच समुद्राचे रक्षक आहोत. त्यामुळे यात चिनी अर्थव्यवस्थेचा विस्तार करण्याची क्षमता आहे. या काळात दोन्ही देशांमध्ये २.१ अब्ज डॉलर्सचे गुंतवणूक आणि सहकार्य करारही झाला. युनूस यांनी चीनमध्ये भारताबाबत केलेली विधाने त्यांना महागात पडली आहेत.