दुबई : वृत्तसंस्था
भारत आणि पाकिस्तान यांच्यात अल्पकालिन किंवा पारंपरिक युद्ध झाल्यास, भारताला थेट लष्करी खर्चासाठी दररोज सुमारे रु.१,४६० कोटी ते रु. ५,००० कोटी इतका खर्च येऊ शकतो. असं दुबईच्या परराष्ट्र व्यवहार मंचाच्या विश्लेषणातून समोर आले.
या विश्लेषणानुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यात पारंपरिक स्वरूपाचं अल्पकालीन युद्ध झाल्यास भारताला प्रतिदिन सुमारे रु. १,४६० कोटी ते रु. ५,००० कोटी इतका थेट लष्करी खर्च सहन करावा लागू शकतो. कारगिल युद्धाच्या अनुभवावरून ही आकडेवारी मांडण्यात आली असून, १९९९ मध्ये झालेल्या या संघर्षात भारताने सुमारे रु. १० ते रु. १५ कोटी रोजचा खर्च केला होता. हवाई हल्ल्यांवरच सुमारे रु. २,००० कोटींचा खर्च झाल्याची नोंद आहे. भारत पाकिस्तानच्या अल्पकालीन की दीर्घकालीन, कोणत्याही स्वरूपाचं युद्ध देशासाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत महाग ठरू शकतं. असं या विश्लेषणातून समोर येतं.
संघर्ष दीर्घकाळ चालला तर त्याचे परिणाम केवळ लष्करी पातळीपुरते राहणार नाहीत. जर युद्ध दीर्घकाळ चाललं, तर भारताला केवळ काही आठवडे नव्हे, तर महिन्यांनमहिने युद्धसज्जतेत राहावं लागेल. अशा स्थितीत भारताचा दररोजचा संरक्षण खर्च देशाच्या वार्षिक संरक्षण बजेटपेक्षा दुप्पट होऊ शकतो. सध्या भारताचं वार्षिक संरक्षण बजेट सुमारे $२० अब्ज (रु. १.७१ लाख कोटी) इतकं आहे.
चार आठवड्यांच्या युद्धामुळे देशाला $५०० अब्जपेक्षा अधिक, म्हणजेच सुमारे रु. ४३ लाख कोटींचं नुकसान होऊ शकतं. जीडीपी मध्ये जवळपास २० टक्के घट होण्याची शक्यता या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. दररोजच्या आर्थिक फटक्याचा अंदाज $१७.८ अब्ज (रु. १.३४ लाख कोटी) एवढा आहे.