छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करणार असून, यासाठी २० जानेवारीला पायी मुंबईच्या दिशेने निघणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली. त्यामुळे लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू असून, आज मंत्री संदिपान भुमरे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी, मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भुमरे आणि जरांगे यांच्यात चर्चा झाली. यावेळी जरांगे यांनी आपल्या काही मागण्या भुमरे यांच्यामार्फत सरकारकडे केल्या आहेत.
शिंदे गटाचे नेते तथा रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी आज दुपारी छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जाऊन जरांगे यांची भेट घेतली. यावेळी भुमरे यांनी जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. याबरोबरच जरांगे आणि भुमरे यांच्यात मराठा आरक्षणावरून चर्चा झाली. दरम्यान, निष्पाप मराठ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, आंदोलन काळात अपघातात मयत झालेल्या मराठ्यांंना मदत करण्यात यावी, आरटीओ परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या द्याव्यात आणि सारथीबाबतचे प्रश्न तातडीने सोडवावे, अशा मागण्या जरांगे यांनी सरकारकडे केल्या आहेत.