भेटा : श्रीधर माने
औसा तालुक्यातील भेटासह परिसरात आठवडाभरापासून अवकाळी असलेल्या पावसामुळे परिसरातील कांदा ,टोमॅटो, टरबूज उत्पादक शेतक-यांना मोठा फटका बसला आहे. काढणीला आलेले व काढून ठेवलेले कांद्याचे पीक नासून सडत असून, केलेला खर्चही पाण्यात गेल्याने शेतक-यांचे डोळे पाणावले आहेत.
प्रामुख्याने बारा महिने कांद्याचे पीक घेणारे काही शेतकरी या भागात असून, उन्हाळी कांदा टिकाऊ असल्याने त्याच्या उत्पादनाकडे मोठ्या प्रमाणात परिसरातील शेतकरी वळले होते मात्र यावर्षी मे महिन्यात अवकाळीने मोठा मुक्काम ठोकल्याने काढणीला आलेला व काढून ठेवलेला कांदा नासून खराब झाला आहे तसेच कमी पाण्यावर कांदा, टोमॅटो बरोबर टरबुजाची पण तशीच स्थिती निर्माण झाली आहे टरबूज जाग्यावर सडत असून माल पूर्ण खराब होत आहे. शेतक-यांना मोठा फटका बसला असून, मेहनतींसोबत केलेला खर्चही पाण्यात गेल्याने शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे. सरकारने केवळ आश्वासन न देता नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत देण्याची गरज आहे.