छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. यात काही भागात मान्सूनचे देखील आगमन झाले असून. मागच्या चोवीस तासांत मराठवाड्यातील ६८० गावांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तर ३४ महसूल मंडळांत जोरदार पाऊस पडल्याने पावसाळ्यापूर्वीच दाणादाण उडाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.
राज्यात मागील दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. यात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये गेल्या चोवीस तासांत दमदार पाऊस झाला. यामध्ये संभाजीनगर, जालना, नांदेड, लातूर आणि हिंगोली या पाच जिल्ह्यांतील तब्बल ३४ महसूल मंडळांतर्गत असलेल्या सुमारे ६८० गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. या गावांमध्ये ६५ मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. यामुळे अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
मे महिन्यातील १६ दिवस पावसाची नोंद
दरम्यान मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये १७ महसूल मंडळे जालना जिल्ह्यातील आहेत. तर मराठवाड्यात ६ मेपासून मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. मे मधील २८ पैकी १६ दिवस पावसाची नोंद झाली असून मागील २५ वर्षांत मे महिन्यात इतक्या दिवस पाऊस बरसण्याची ही पहिलीच वेळ आहे. मराठवाड्यात यंदा मे महिन्यात सरासरी १७७ मिमी पाऊस पडला असून २७ ते २८ मे या दोन दिवसांत सकाळी ८ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत आठही जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडला आहे.
जालना जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस
दरम्यान विभागात सरासरी २३.६ मिमी पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक ४४ मिमी पाऊस जालना जिल्ह्यात पडला आहे. या खालोखाल नांदेड जिल्ह्यात ३० मिमी, बीड जिल्ह्यात २६ मिमी, हिंगोली जिल्ह्यात २७ मिमी, परभणी आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी २२ मिमी आणि धाराशिव जिल्ह्यात १० मिमी पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे पूर आल्याने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही.