तांत्रिक अडचण, एसईबीसी आरक्षणाचा लाभ नाही?
नागपूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ चे शुद्धिपत्रक जाहीर करून ज्या मराठा उमेदवारांनी अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातून अर्ज केला असेल, त्यांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातून (एसईबीसी) नव्याने अर्जाची मुभा दिली होती. त्यानुसार हजारो विद्यार्थ्यांनी ‘एसईबीसी’ प्रवर्गातून सुधारित अर्ज केला होता. मात्र, आता मुख्य परीक्षेसाठी अर्ज करताना हजारो मराठा उमेदवारांचे अर्ज हे ‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्गातच असल्याने मोठा तांत्रिक गोंधळ निर्माण झाला आहे. आयोगाने यात सुधारणा न केल्यास मराठा उमेदवार आरक्षणाच्या लाभाला मुकण्याची दाट शक्यता आहे.
मराठा समाजाला स्वतंत्र १० टक्के आरक्षण मिळाल्यामुळे त्यांना ‘ईडब्ल्यूएस’ आरक्षणाचा लाभ घेता येणार नसल्याने भविष्यात मोठा कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्य शासनाने फेब्रुवारी २०२४ मध्ये मराठा आरक्षणाचा कायदा केला. परंतु आरक्षण लागू होण्याआधी ‘एमपीएससी’च्या अनेक जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे ‘एमपीएससी’ने शुद्धीपत्रक काढून मराठा उमेदवारांनी खुला किंवा ‘ईडब्ल्यूएस’मधून अर्ज केला असल्यास त्यांना ‘एसईबीसी’ प्रवर्गातून नव्याने अर्जाची संधी दिली होती. त्यानुसार मराठा उमेदवारांनी नव्याने ‘एसईबीसी’ प्रवर्गातून अर्ज केला. परंतु, त्यानंतरही त्यांचा अर्ज हा आता ‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्गातच असल्याचे आयोगाच्या संकेतस्थळावर दाखवत आहे. यासाठी काही उमेदवारांनी ‘एमपीएससी’च्या सचिवांचीही भेट घेतली. मात्र, त्यानंतरही तोडगा न निघाल्याने या उमेदवारांचे भविष्य अंधरात जाण्याची शक्यता आहे.