बीड : मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांनी अहिल्यानगर येथे पत्रकार परिषद घेत भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
जरांगे पाटलांनी यावेळी भाजपमधील मराठा नेत्यांची अस्वस्थता सांगत खळबळ उडवून दिली. जरांगे पाटलांच्या या धक्कादायक दाव्यावर भाजपकडून काय रिऍक्शन येते, याकडे आता लक्ष लागले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी, भाजपमधील अनेक मराठा नेते मला फोन करून सांगतात की त्यांना त्रास दिला जात आहे. आतापर्यंत मला ३०-३२ आमदार-खासदारांचे फोन आले आहेत, असा दावा केला आहे. देवेंद्र फडणवीस मराठ्यांचे नेते आणि अधिकारी संपवण्याच्या कामाला लागले आहेत, असा खळबळजनक दावा जरांगे पाटील यांनी केला आहे.
‘प्रत्येक मंत्र्यांना फडणवीस यांनी स्वत:चे डरऊ दिले आहेत. भाजप वेगळा होता. पण फडणवीस यांनी पक्षाची दिशा बदलली आहे. सत्तेसाठी त्यांनी नारायण राणे, अजित पवार, राधाँस्रष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण यांसारख्या अनेक नेत्यांना पक्षात घेतले. एवढेच नव्हे तर भाजपमधीलच अनेक नेते संपवण्याचे कामही सुरू आहे, असा दावा देखील जरांगे पाटील यांनी केला.
सत्तेसाठी आपल्या लोकांना लाथा मारण्याचे काम सुरू आहे, आणि माझ्याकडे त्याची यादीही आहे. जालना, सोलापूर आणि नांदेड येथेही अनेक मराठा नेत्यांना त्रास दिला जात आहे, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ‘आमची परिस्थिती बिकट आहे’ असे सांगणारे नेते दररोज संपर्क साधत आहेत, असा दावा जरांगे पाटील यांनी केला आहे.
आंदोलनावर ठाम
मराठा आरक्षणासाठी लढा तीव्र करणार असल्याची भूमिका मनोज जरांगे पाटलांनी मांडली. मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे, त्याच्याशिवाय दुसरा आरक्षण आम्ही घेणार नाही. २९ ऑगस्टला ‘चलो मुंबई’च्या निर्णयावर आम्ही ठाम असल्याचेही जरांगे पाटील यांनी म्हटले.
समाजाची भूमिका महत्त्वाची
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये समाज निर्णय घेईल. मी याबाबत भूमिका घेण्याचा आक्रस्ताळेपणा करणार नाही. समाजाला जो निर्णय वाटेल तो समाज घेईल फक्त आरक्षणाच्या मुद्यावर आम्ही ठाम आहोत, अशीही भूमिका जरांगे पाटील यांनी मांडली.