25.3 C
Latur
Thursday, June 27, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र नाही !

मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र नाही !

राज्य सरकारचे आश्वासन : छगन भुजबळ सगेसोयरेबाबत सर्वपक्षीय बैठकीत निर्णय घेणार

मुंबई : मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्यात येणार नाही असे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे. तसेच सगेसोयरेंना आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे त्याबाबत येत्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सर्वपक्षीय बैठक घेउन निर्णय घेण्यात येईल. ओबीसी,ईडडब्ल्यूएस,एसईबीसी हे सर्व दाखले आधार कार्डाशी जोडण्यात येतील. तसेच मराठा समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी जशी मंत्रयांची समिती आहे तशीच समिती ओबीसी-भटक्या समाजासाठीही तयार करण्यात येईल.

तसेच खोटे कुणबी दाखले देणारा आणि घेणारा दोघेही गुन्हेगार असून अशी प्रकरणे आढळल्यास त्यावर कारवाई करण्याचे आश्वासन आजच्या बैठकीत सरकारने दिले असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. मी तसेच माझ्यासोबत सात ते आठ मंत्रयांचे शिष्टमंडळ शनिवारी वडीगोद्री येथे जाउन प्रा. लक्ष्मण हाके यांचे उपोषण मागे घेण्याची विनंती करणार असल्याचेही छगन भुजबळ यांनी सांगितले. दरम्यान, जातीनिहाय जनगणनेच्या आमच्या मागणीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पांिठबा दिल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

राज्यात लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर मराठा आरक्षणाच्या प्रश्नाने पुन्हा एकदा उचल घेतली आहे. खोटया कुणबी दाखल्यांच्या तसेच इतर मुददयांवरून वडीगोद्री येथे ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी गेल्या ९ दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर सहयाद्री अतिथीगÞह येथे उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, अतुल सावे, उदय सामंत, गिरीश महाजन, धनंजय मुंडे यांच्यासह पंकजा मुंडे, प्रकाश शेंडगे, गोपीचंद पडळकर, वडीगोद्री-जालना आदी भागांतील ओबीसी समाजाचे नेते-कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना माहिती देताना छगन भुजबळ म्हणाले, मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्यात येणार नाही,कायदयाला देखील ते मान्य होणार नाही असे आश्वासन आम्हाला सरकारतर्फे देण्यात आले आहे. जातीची खोटी प्रमाणपत्रे कोणालाही दिली जाणार नाहीत. खोटे कुणबी दाखले दिले असतील तर ते तपासण्यात येतील. खोटी प्रमाणपत्रे देणारे आणि घेणारे हे दोघेही गुन्हेगार असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. काही जण अनेक वेळा वेगवेगळे दाखले काढून फायदे घ्यायला बघतात.

ओबीसी, ईडडब्ल्यूएस,एसईबीसी असे सगळयातून फायदे घेतात. हे सर्व दाखले आधार कार्डाला जोडण्याचे काम करण्यात येईल. जेणेकरून एक व्यक्ती एकाच योजनेचा फायदा घेउ शकेल. मंत्रीमंडळात जशी मराठा समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रयांची समिती आहे तशी ओबीसी भटक्या समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रयांची समिती स्थापन करण्यात येईल. सगेसोयरेमध्ये अनेक त्रुटी आहेत. प्रमाणपत्र कसे दयावे जातपडताळणी कशी करावी यासंदर्भात पूर्ण माहिती असणारे एक पुस्तकच आहे त्याप्रमाणे सगळयाची पूर्तता करून प्रमाणपत्र देण्यात येते.

अधिवेशन काळात सर्वपक्षीय नेत्यांची एक बैठक घेउन सगेसोयरेबाबत काय करायचे याचा निर्णय घेण्यात येईल. सगेसोयरेंचा प्रश्न सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घेउनच सोडविण्यात येईल. मराठा समाजावर तसेच ओबीसी भटक्या समाजावर अन्याय होउ देणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे छगन भुजबळ म्हणाले.

वडीगोद्रीला मंत्रयांचे शिष्टमंडळ जाणार !
आजच्या बैठकीत जे निर्णय झाले आहेत त्याची माहिती शनिवारी आपण वडीगोद्री येथे जाउन लक्ष्मण हाकेंना देणार आहोत. माझ्यासोबत सात ते आठ मंत्रयांचे शिष्टमंडळ असणार आहे. लक्ष्मण हाकेंनी उपोषण मागे घ्यावे अशी विनंती त्यांना करू. तसेच अधिवेशन काळादरम्यान जी बैठक होणार आहे त्या बैठकीला हाकेंनी उपस्थित रहावे अशी विनंती त्यांना आम्ही करू असेही भुजबळ म्हणाले.

राजकीय जीवन जनता उदध्वस्त करते !
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आपण छगन भुजबळ यांचे राजकीय जीवन उदध्वस्त करू असा इशारा दिला आहे. त्यावर कोणाचेही राजकीय जीवन ही जनता उदध्वस्त करू शकते, कोणा एका-दुस-या माणसाचे ते काम नाही. आमच्या सोबत जनतेचा भरपूर आशिर्वाद असल्याचेही छगन भुजबळ यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR