लखनौ : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले. या महाकुंभमेळ्यासाठी योगी सरकारने ६ हजार कोटींपेक्षा जास्त खर्च केल्याचे म्हटले जात आहे. यावरून राजकीय वातावरणही तापले. मात्र, यावर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभमेळ्याच्या आयोजनासाठी १५०० कोटीचा खर्च करण्यात आला, असे सांगितले.
आपल्याला दर सहा वर्षांनी कुंभ आणि दर १२ वर्षांनी महाकुंभाचे आयोजन करण्याची संधी मिळते. आपण जे काही उपक्रम करतो, त्यामुळे आपल्या पर्यटनाला चालना मिळते. महाकुंभामुळे उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेला ३ लाख कोटी रुपयांची चालना मिळणार आहे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.
५०००-६००० कोटी रुपये का खर्च केले, असे विरोधकांकडून विचारले जात आहे. मात्र, ही रक्कम केवळ महाकुंभसाठी नाही तर प्रयागराज शहराच्या नूतनीकरणावरही खर्च करण्यात आली आहे. महाकुंभच्या आयोजनासाठी एकूण १५०० कोटी रुपये खर्च झाले. त्या बदल्यात जर आपल्या अर्थव्यवस्थेला ३ लाख कोटींचा फायदा होत असेल आणि राज्याची अर्थव्यवस्था मजबूत होत असेल तर ही रक्कम योग्यरित्या खर्च झाली आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. जेव्हा उत्तर प्रदेशातील महाकुंभात ५०-५५ कोटी लोक सामील होतात, तेव्हा आपल्या अर्थव्यवस्थेला किती फायदा होईल. महाकुंभामुळे उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था ३ लाख कोटी रुपयांनी वाढली आहे.