अहमदपूर : प्रतिनिधी
या तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील श्री महादेव मंदिर हे अकराव्या शतकापूर्वीचे असून अकराव्या शतकाच्या उत्तरार्धात या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याचा उल्लेख या ठिकाणी असलेल्या शिलालेखात सापडतो. त्यानंतर तत्कालीन भौगोलिक परिस्थितीमुळे कदाचित हे मंदिर लुप्त झाले असावे असेही सांगितले जाते. येथील महादेव मंदिरात भक्तांच्या उपस्थितीत अगदी उत्साहाने लग्न सोहळा पार पडला.
येथे मंदिर परिसरात अनेक वर्षांपासून यात्रा भरते. यात्रेच्या वेळी आजुबाजुच्या परिसरात खेड्यातील भाविक भक्त मोठ्या उत्साहाने यात्रेत येऊन देवाचे दर्शन घेत असतात. यात्राकाळात विविध धार्मिक कार्याक्रमचे आयोजन करण्यात आले होते . शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण , ७ दिवस विविध महाराजांचे कीर्तन ठेवण्यात आले होते. एकादशीच्या दिवशी पालखीमधून वाजत गाजत काठी- कावडी सोबत महादेवाची मूर्ती मंदिरामध्ये प्रवेश करते, द्वादशीला महादेवाचे व पार्वतीचा विवाह सोहळा मानकरी रणधीर पाटील व काठी कावडीचे मानकरी व भाविकभक्तांच्या साक्षीने अगदी उत्साहाने पार पडला. दुस-या दिवशी खीर, हुलपली व भाताचा महाप्रसाद असतो. हनुमान जयंतीला काठी कावडीसोबत देव गावात जातात व यात्रेची सांगता होते. यात्रे दरम्यान गावातील, कामानिमित बाहेरगावी असलेले नागरिक व बाईलेकी यावेळी महादेवाची पूजा मांडण्यासाठी गावाकडे येतात व सहकुटुंब पूजा मांडतात. गहू किवा तांदळाची रास मांडून त्यावर खोबराचा खोबळा ठेवून चाफ्याच्या फुलांची पूजा मांडली जाते .
शिरूर ताजबंद येथील श्री महादेव मंदिर देवस्थानचे अध्यक्ष सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनीही आपली उपस्थिती या सोहळ्याला लावली होती. मंदिरातील महादेवाची पिंड ही स्थापित नसून स्वयंभू असल्याचे सांगितले जाते. या महादेव मंदिरातील शिवलिंगाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील पिंडी भोवती कायम पाणी असते, हा सुद्धा एक वेगळेपणा पहायला मिळतो. या मंदिरास २५० वर्षांच्या यात्रेचा इतिहास आहे. या मंदिरावर अनेक पंचक्रोशीतील भाविकांची फार मोठी श्रद्धा असल्याचे पहायला मिळते. येथील श्री महादेव मंदिर हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या भागातील नागरीक सर्व शुभ कार्याची सुरुवात श्री महादेवाची पूजा करूनच करतात.
लातूर ज् ियात अनेक प्राचीन शिवमंदिरे आहेत. प्रत्येकाच्या अनोख्या अशा आख्यायिका आहेत. यामधील एक असलेले शिरूर ताजबंद येथील श्री महादेव मंदिराचा उल्लेख होतो. साधारणपणे सहाशे वर्षांपूर्वी या ठिकाणी एक शेतकरी शेतात नांगरत असताना त्याच्या नांगराला महादेवाची पिंड लागली असता शेतक-याने ती पिंड वर काढली. नांगरताना त्या पिंडीला नांगराचा जो व्रण उठला आहे. तो आजही या ठिकाणी असलेल्या महादेवाच्या पिंडीवर व्रण पहायला आढळतो. या मंदिराच्या सभोवती प्रसादाचे स्टॉल्स, खेळणे , पाळणे, मिठाई चार मोठा बाजार भरतो. गावातील व खेड्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येने येत असल्याने यात्रा मोठी भरते. मंदिराच्या शेजारी शिवपार्वती मंगल कार्यालय असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम पार पडतात. मंदिर कमीटीचे कार्यकारी मंडळ भजनी मंडळ, गावातील व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते , तरुण पिढी,भाविक भक्त, व्यवस्थापक शिवाजी स्वामी यात्रा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत असतात. यात्रेच्या वेळी ग्रामपंचायतीचे ही चांगले सहकार्य मिळत असते.