25.6 C
Latur
Wednesday, July 3, 2024
Homeमहाराष्ट्रमहायुतीची घोषणा फुल्ल, प्रत्यक्षात मात्र बत्ती गुल

महायुतीची घोषणा फुल्ल, प्रत्यक्षात मात्र बत्ती गुल

मुलींच्या मोफत शिक्षणाबाबत वडेट्टीवारांचा महायुतीवर हल्लाबोल

मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी १ जून महिन्यापासून राज्यातील मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली होती. मात्र ही घोषणा हवेत जिरली असून विद्यार्थिनींना शिक्षण घेण्यासाठी फी भरावी लागत आहे. याच मुद्द्यावरुन आता विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीची घोषणा फुल्ल, प्रत्यक्षात मात्र बत्ती गुल असे वक्तव्य करत युती सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, शिक्षणमंत्र्यांनी मुलींना मोफत शिक्षण दिले जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र आता जून महिना अर्धा उलटला तरी अद्याप सरकारी जीआर निघाला नाही, अंमलबजावणी तर दूरची गोष्ट आहे. नुसत्या घोषणा करणे, प्रसिध्दी मिळवणे, कारभार मात्र शून्य,असे महायुती सरकारचं कामकाज असल्याची बोचकरी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

विजय वडेट्टीवार यांनी याबाबत एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. एक्सवरीव पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, राज्याचे शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी १ जूनपासून राज्यात मुलींना मोफत शिक्षण दिले जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र आता जून महिना अर्धा उलटला पण सरकारी जीआर निघाला नाही. अंमलबजावणी तर अजूनही दूरच.

घोषणांचा उडाला फज्जा
एक राज्य एक गणवेश या योजनेला सर्व स्तरातून विरोध झाला. तरी सरकारने जीआर काढून अंमलबजावणीचे आदेश दिले. आता शाळा सुरू झाल्या तरी विद्यार्थ्यांना गणवेश आले नाही. या घोषणेचा पण फज्जा उडाला. नुसत्या घोषणा करणे, प्रसिध्दी मिळवणे, कारभार मात्र शून्य,असे महायुती सरकारचे कामकाजठ, अशा शब्दात त्यांनी युती सरकारवर टीका केली. त्यामुळे आता राज्य शासन मुलींच्या मोफत शिक्षणासंदर्भातील जीआर कधी काढणार आणि त्याची अंमलबजावणी कधी करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR