नंदुरबार : प्रतिनिधी
आमदार डॉ. विजयकुमार गावित आणि शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यातील वाद राज्यासाठी नवीन नाही. त्यांच्यातील अंतर्गत वाद वाढतच चालला आहे. कामगार कल्याण मंडळाच्या भांडीवाटपाच्या कार्यक्रमादरम्यान त्यांच्यातील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात महायुतीतील दोन्ही पक्षांमध्ये आगामी निवडणुकांपूर्वीच घमासान सुरू झाले आहे. आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी यापूर्वीच भाजपा कार्यकर्त्यांना ‘एकला चलो रे’ चा नारा दिला आहे. तर, शिवसेनेकडून आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी देखील तसाच इशारा दिला आहे. कारण, काहीही असो महायुतीतील दोन्ही पक्ष समोरासमोर येण्यासाठी तयार आहेत. तर, इतर पक्षांकडून बघ्याची भूमिका घेतली जात आहे.
नंदुरबार येथे कामगार कल्याण मंडळातर्फे मिळणारे सुरक्षा संच आणि भांडी पेटी घेण्यासाठी लाभार्थी मध्यरात्रीपासून रांगेत उभे होते. परंतु, दुस-या दिवशी सकाळी उशिरापर्यंत भांड्यांचे वाटप झाले नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी आमदार कार्यालयात तक्रारी केल्या. या तक्रारींची दखल घेत शिवसेनेचे नंदुरबार जिल्हाप्रमुख ऍड. राम रघुवंशी यांनी भांडीवाटपाच्या ठिकाणी जाऊन कामगार महामंडळाच्या अधिका-यांशी चर्चा करून मध्यस्थी करत भांडीवाटपाला सुरुवात केली. तर, यावेळी आमदार डॉ. विजयकुमार गावित देखील त्या ठिकाणी दाखल झाले. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
भांडी घेण्यासाठी लाभार्थ्यांची गर्दी
योजनेतील भांडी घेण्यासाठी लाभार्थ्यांनी चांगलीच गर्दी केली होती. भांडी घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे पुत्र शिवसेना जिल्हा प्रमुख राम रघुवंशी यांनी भांडी वितरण करण्याच्या ठिकाणी भेट दिली. यावेळी लाभार्थ्यांनी भांडी पेटी वाटप लवकर होत नसल्याची तक्रार त्यांच्याकडे केली. यानंतर राम रघुवंशी यांनी या प्रकरणाची तक्रार आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडे केली. रघुवंशी यांनी तात्काळ अधिका-यांशी संपर्क करून भांडी वाटप करण्याच्या सूचना केल्या. यानंतर लाभार्थ्यांना भांडी वाटप का करत नाही? असा सवाल जिल्हाप्रमुख राम रघुवंशी यांनी ठेकेदाराला केला. जोपर्यंत लोकप्रतिनिधी कार्यक्रमाच्या ठिकाणी भांडीवाटपाला येत नाहीत, तोपर्यंत लाभार्थ्यांना ती देता येणार नाही, असे ठेकेदाराने सांगितले.
योजना शासनाची…
योजना आम्हीच मंजूर करून आणली, अशी वल्गना कोणीही करू नये. कोणताही पुढारी घरून योजना राबवत नसतो. योजना शासन, प्रशासन आणि महायुती सरकारची आहे. पात्र लाभार्थ्यांना त्यांचा लाभ मिळालाच पाहिजे. पण, लोकप्रतिनिधीच्यांच हस्ते वाटप करण्याचा अट्टाहास करून हजारो लोकांना रांगेत ताटकळत ठेवणे योग्य नाही, असे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले.