मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र लढले आहेत. मात्र महानगरपालिकेची निवडणूक एकनाथ शिंदे गट स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे.
मुंबई, ठाणे महापालिका निवडणूक एकत्र लढून मात्र उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती होईल असे वाटत नाही, असे भाष्य एकनाथ शिंदे गटाच्या नेत्या नीलम गो-हे यांनी केले आहे.
मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. शिवसेना मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार असल्याचा दावाही नीलम गो-हे यांनी केला आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महायुती म्हणून लढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पुणे महानगरपालिका, मुंबई, ठाणे वगळता उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती होईल असे वाटत नाही. या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते. यामुळे आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत नीलम गो-हे यांनी दिले आहेत.
महायुतीला सकारात्मक वातावरण
विधानसभा निवडणुका पार पडल्या. आता राज्यात स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकांमध्ये महायुतीला सकारात्मक वातावरण आहे. महापालिका निवडणुका लवकर घेऊन प्रशासकाला बदलले पाहिजे, अशी भूमिका नीलम गो-हे यांनी मांडली आहे.
मैत्रीपूर्ण लढतीची जास्त शक्यता
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांची वेगळी ताकद आहे. त्यामुळे मैत्रीपूर्ण लढतीची जास्त शक्यता आहे, असेही नीलम गो-हे यांनी सांगितले. मात्र एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज संस्थांची निवडणूक स्वबळावर लढणार की नाही यावर अजूनही भाष्य केले नाही.