रायगड : प्रतिनिधी
रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद अजूनही सुटलेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पालकमंत्र्यांची घोषणा केली होती. परंतु रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत तिन्ही पक्षांमध्ये आधीच ठरलेलं होतं, असा दावा उदय सामंत यांनी दापोलीत एका कार्यक्रमात केल्याने पुन्हा एकदा महायुतीचा वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता वाढली आहे.
दरम्यान, मंत्री भरत गोगावले हे रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी या पदावर दावा केला होता. असे असतानाही आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री केले गेले. पुढे मात्र त्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली. त्याआधी रायगडचे पालकमंत्रिपद हे शिवसेनेच्या उदय सामंत यांच्याकडे होते. त्यांनी आता रायगडचे पालकमंत्री कोण होणार हे आधीच ठरलं होतं. याबाबतचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. त्यामुळे महायुतीत रायगड पालकमंत्रिपदावरून वाद होण्याची शक्यता आहे.
या आधी रायगडचे पालकमंत्रिपद हे राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना दिले होते. त्यानंतर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार नाराज झाले होते. मंत्री भरत गोगावले यांच्या समर्थकांनी रास्ता रोको केला होता. आदिती तटकरे यांना विरोध करण्यात आला होता. वाढता विरोध लक्षात घेता रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली होती. तेव्हापासून आजपर्यंत पालकमंत्र्यांची नियुक्ती झालेली नाही. मात्र उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या वक्तव्याने हा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.
मी अडीच वर्षे रायगडचा पालकमंत्री होतो. भरतशेठ गोगावले तेव्हा मंत्री झाले नव्हते. म्हणून ती जबाबदारी त्यावेळी माझ्यावर होती. पण जेव्हा भरतशेठ पुन्हा निवडून येतील तेव्हा ते तिथे पालकमंत्री होतील, असे तिन्ही पक्षांमध्ये ठरलेले होते, असा गौप्यस्फोट उदय सामंत यांनी केला आहे. त्यामुळे भरत गोगावलेच पालकमंत्री व्हावेत असे आम्हा सर्वांचे म्हणणे आहे असेही ते यावेळी म्हणाले.
पालकमंत्रिपदाचा वाद अजूनही कायम
पालकमंत्रिपदाबाबत तिन्ही नेत्यांनी मिळून मार्ग काढावा असेही ते म्हणाले. मात्र उदय सामंत यांनी जाहीर पणे पहिल्यांदा रायगडच्या पालकमंत्रिपदावर दावा केला आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. की ते ‘जैसे थे’ स्थिती ठेवतात हे ही पाहावे लागणार आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात मोठ्या प्रमाणात वाद आहे. दोघांमधून विस्तवही जात नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे पालकमंत्रिपदाचा वाद अजूनही तसाच आहे.