28.5 C
Latur
Saturday, October 26, 2024
Homeलातूरमहायुतीने महाराष्ट्राची अस्मिता गहाण ठेवली

महायुतीने महाराष्ट्राची अस्मिता गहाण ठेवली

लातूर : प्रतिनिधी
महायूती सरकारने महाराष्ट्राची लूट चालवली आहे, त्यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचार राज्यात फोफावला आहे, महाराष्ट्राची अस्मिता त्यांनी गहाण ठेवली आहे. राज्यात शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत, शेतीमालाला हमीभाव मिळत नाही, सर्वांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्रात आता महाविकास आघाडीचे सरकार आणायचे आहे, असे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले.
जनसंपर्क अभियाना अंतर्गत दि. २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी लातूर तालुक्यातील गंगापूर येथील पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्थानिक महिलांनी औक्षण, पुष्पवृष्टी करुन  ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करून लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अमित देशमुख यांचे स्वागत केले. यावेळी लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, लातूर पंचायत समितीच्या माजी सभापती शितल फुटाणे, लातूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ. सतीश कानडे, तानाजी फुटाणे,  गंगापूरचे निरीक्षक श्याम बरूरे, गंगापूरचे  उपसरपंच बिभीषण शिंदे, पद्माकर वाघमारे, भास्कर शिंदे, मारुती पवार, जालमियॉ शेख, चंद्रशेखर दंडिमे, राम स्वामी, रत्नदीप अजनीकर, विजय टाकेकर, दगडू घुट्टेकर, किरण शिंदे आदीसह काँग्रेस महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरीक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.  छत्रपती शिवाजी महाराज चौक गंगापूर येथून पदयात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी श्री हनुमान मंदिर येथे जाऊन दर्शन घेतले त्यानंतर बनसोडे गल्ली, पाटील गल्ली, माळी गल्ली इथून पदयात्रा जाऊन सभा मंडप जिल्हा परिषद गंगापूर येथे पदयात्रेचा समारोप झाला.
गंगापूरच्या विकासासाठी १९ कोटी रुपये निधी
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी पहिल्यांदा जो बापट आयोग स्थापन केला तो लोकनेते विलासराव देशमुख यांनी केला. आपलं नातं हे अनेक दशकांचं आहे. गंगापूरच्या विकासासाठी १९ कोटी रुपये निधी आम्ही खेचून आणला गंगापूरला जोडणारा मार्ग क्रमांक अकराला तातडीने मंजुरी देऊ गंगापूरला महसूल मंडळ झाले पाहिजे, तसेच येत्या तीन महिन्यात गंगापूरला लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा निर्माण करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रात आता महाविकास आघाडीचे सरकार आणायचे आहे. महायूती सरकारने महाराष्ट्राची लूट चालवली आहे त्यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचार राज्यात फोफावला आहे महाराष्ट्राची अस्मिता त्यांनी गहाण ठेवली आहे. राज्यात शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत, शेतीमालाला हमीभाव मिळत नाही, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, लोकनेते विलासराव देशमुख, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख या नेत्यांनी आम्हाला शिकवले पारदर्शक काम कसे करायचे. भाजपने मागच्या साडेसात वर्षात लातूरात विकास केला नाही, महाविकास आघाडीचे सरकार त्यांनी षडयंत्र रचून पाडले व अभद्र महायुतीचे सरकार स्थापन केले.त्यांनी आमदार खासदारांची खरेदी विक्री केली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीश कानडे  यांनी मनोगत व्यक्त्त केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम स्वामी यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR