मुंबई : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गोंधळात आणि घाईघाईने मंजूर करण्यात आलेल्या ‘नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (सुधारणा) विधेयक २०२६’ च्या आडून महाराष्ट्रातील सहकार चळवळ आणि नागरी सहकारी बँकांचे जाळे मोडून काढण्याचे केंद्राचे मोठे षड्यंत्र आहे, असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मराठीत पत्र लिहिले आहे. त्याशिवाय, याबाबतची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सुद्धा दिली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, त्यांनी या प्रकरणावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही जाब विचारला आहे. परंतु, राऊतांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे महाराष्ट्राच्या बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी (२१ ऑगस्ट) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, अमित शहा हे मुंबईत आले. परंतु, ते संसदेत आले नाहीत. आम्ही त्यांची तिथे वाट पाहात होतो. मात्र, शहा जेव्हा मुंबईत आले तेव्हा त्यांनी फोर्टच्या शारदा सदन इमारतीच्या दुस-या मजल्यावरील ‘नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’चे उद्घाटन केले. ही संस्था सर्व नागरी सहकारी बँकांची प्रमुख (ऍपेक्स संस्था) म्हणून काम करेल, असे जाहीर करण्यात आले. या निर्णयाचा महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकांना मोठा फटका बसणार आहे. महाराष्ट्रातील बँकांवर वर्चस्व मिळवण्यासाठी किंवा त्या बंद पाडण्यासाठी ९ ऑगस्ट रोजी संसदेत एक विधेयक घाईघाईने मंजूर करून घेण्यात आले, असे राऊतांनी सांगितले.
तसेच, महाराष्ट्र हे सहकार चळवळीतील अग्रगण्य राज्य आहे. सहकाराची मुहूर्तमेढ याच भूमीत रोवली गेली आहे. असे असतानाही या निर्णयाबाबत महाराष्ट्रातील एकाही घटकाचे किंवा बँकेचे मत विचारात घेतले गेले नाही. या धोरणामुळे राज्यातील बँकांवर काय परिणाम होईल, याचा कोणताही अभ्यास करण्यात आला नाही. गुजरातमधील एका घोटाळेबाज बँकेला वाचवण्यासाठी तिचे विलीनीकरण ‘नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’मध्ये करण्यात आले आणि त्याद्वारे तेथील भ्रष्टाचार दाबण्याचा प्रयत्न झाला. राज्यातील नागरी सहकारी बँकांचे अस्तित्व धोक्यात आणणारा हा निर्णय होत असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय करत होते? त्यांना या विषयातील गांभीर्य कळते का? असा सवाल राऊत यांनी केला आहे.
अमित शहा जाता जाता महाराष्ट्रावर मोठा दरोडा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप राऊतांनी केला आहे. त्यांचा हा मनमानी कारभार आणि भ्रष्टाचार महाराष्ट्राला उद्ध्वस्त करणारा आहे. आता महाराष्ट्राने काय करायचे? अमित शहा आणि गुजरातच्या दारात भीक मागायला जायचे का? हा अत्यंत गंभीर विषय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना कळत नसेल आणि ते जर याचे स्वागत करत असतील, तर ते बाळासाहेबांचा कोणता विचार पुढे नेत आहेत? हजारो लोकांची रोजीरोटी या सहकार क्षेत्रावर अवलंबून आहे. सर्व काही गुजरातच्या घशात घालण्यासाठी आणि शहा यांच्या मर्जीतील संस्थांचा फायदा करून देण्यासाठीच हा सर्व प्रपंच सुरू आहे, असेही यावेळी खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.















