नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील पोलिस आयुक्तालयांच्या हद्दीत तीन नवीन फौजदारी कायदे लवकरात लवकर लागू करावेत, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्य सरकारला दिले आहेत.
अधिका-यांनी ही माहिती देताना सांगितले की, महाराष्ट्रात फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी करण्याबाबत नवी दिल्लीत आढावा बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यावेळी उपस्थिती होती. बैठकीच्या अध्यक्षपदावरून शाह म्हणाले की, राज्य सरकारने नवीन कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी अभियोजन संचालनालयाची स्थापना करावी.
राज्यातील ९० टक्के पोलिसांना नवीन कायद्याचे प्रशिक्षण
गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारत सरकारच्या तीन गुन्हेगारी कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र सरकारकडून कोणती तयारी करण्यात आली आहे, याची माहिती गृहमंत्र्यांना देण्यात आली. नवीन कायद्यानुसार गुन्हे दाखल केले जात आहेत. आता कैद्याला साक्ष नोंदविण्यासाठी तुरुंगातून न्यायालयात न्यावे लागते. आता न्यायालयातूनच कबुलीजबाब नोंदविला जाईल. फॉरेंसिक नेटवर्कसाठी २७ व्हॅन तयार करण्यात आल्या आहेत. शिवाय, राज्यातील ९० टक्के पोलिसांना नवीन कायद्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.