मुंबई : प्रतिनिधी
राज्यात टीबीने नागरिकांची भीती वाढवली आहे. महाराष्ट्र टीबीच्या विळख्यात सापडला आहे. राज्यात टीबीच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. गेल्या १०० दिवसांत राज्यात ४० हजार टीबीचे रुग्ण आढळले आहेत. टीबीविरोधी मोहिमेअंतर्गत राज्यातील १.३७ कोटी नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. या तपासणीमधून ही चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे.
राज्यात टीबी आजार हातपाय पसरत असल्याचे दिसत आहे. टीबीच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. टीबी हा संसर्गजन्य आजार नियंत्रणात आणण्यासाठी सर्वस्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. पण या आजाराला अटोक्यात आणण्यात अद्याप यस आले नाही. धक्कादायक बाब म्हणजे जगातील एकूण टीबी रुग्णांपैकी २५ टक्के रुग्ण एकट्या भारतात आहेत. त्यापैकी १० टक्के रुग्ण हे महाराष्ट्रामधील आहेत, ही चिंताजनक आकडेवारी आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे आहे.
महाराष्ट्रात मागच्या वर्षी म्हणजे २०२४ मध्ये २ लाख ३० हजार ५१५ टीबीची लागण झालेल्या रुग्णांची नोंद झाली होती. २०२५ मध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात राज्यात ३९ हजार ७०५ टीबी रुग्णांची नोंद करण्यात झाली आहे. ही चिंता वाढवणारी आकडेवारी आहे. २०२४ मधील टीबी रुग्णसंख्या आणि आता २०२५ मध्ये फक्त २ महिन्यात आढलेल्या टीबी रुग्णांची संख्या ही खूपच जास्त आहे.
टीबी आजाराबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक टीबी दिवस म्हणून साजरा केला जातो. केंद्रीय टीबी रोग विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ७ डिसेंबर २०२४ ते २४ मार्च २०२५ दरम्यान टीबी आजारासाठी अतिजोखीम असलेल्या राज्यातील १७ जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये १०० दिवस टीबी रुग्णशोध मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान २० मार्च अखेरपर्यंत राज्यात ४०, ४७१ टीबी रुग्णांचे निदान झाल्याची माहिती समोर आली.
एआयच्या मदतीने गडचिरोलीत टीबी रुग्णांचे निदान
गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यात क्षयरोग आणि फुफ्फुसांशी संबंधित विविध आजारांचे निदान करण्यासाठी डॉ.अभय बंग यांच्या ‘सर्च’ संस्थेद्वारा संचालित मॉ दंतेश्वरी इस्पितळात आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससारख्या (एआय) तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे. एआय तंत्रज्ञानाद्वारे या वर्षात ८८ क्षय रुग्णांचे निदान केले आहे.