लातूर : प्रतिनिधी
मंगळवार दि.२७ मे रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. रेणापूर- निजामाबाद नॅशनल हायवे क्र. ६३ वर बामणीजवळ पुलाचे काम चालू असल्याने पर्यायी रस्ता सुरु करण्यात आला होता. कालच्या पावसाने हा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला व तेथे असलेला सुचना फलकदेखील वाहून गेला होता. रहदारीचा रस्ता असल्याने नेहमीप्रमाणे वाहने वगात येणे साहजीक होते. पर्यायी रस्त्यावर पाणी असल्याने वाहन चालकांना रात्रीच्या अंधारात काहीच दिसणार नव्हते त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी संबंधीत यंत्रणेशी संपर्क साधून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणुन दिले. परिणामी अवघ्या एका तासात यंत्रणा कार्यान्वित झाली. पर्याची पूलाचे काम सुरु झाल्याने संभाव्य धोका टळला.
बामणीचे उपसरपंच संजय ठाकूर यांनी रेणा कारखान्याचे व्हाईस चेअरमन अॅड. प्रविण पाटील व खासदार डॉ .शिवाजी काळगे यांना संपर्क केला. अॅड. प्रविण पाटील यांनी लागलीच माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांना ही बाब सांगीतली. त्यानंतर माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी नॅशनल हायवेच्या प्रमुखांशी संपर्क करून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणुन दिले व संभाव्य अपघात टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी विनंती केली. यानंतर अवघ्या तासाभरात संबंधित विभागाची यंत्रणा पुलाजवळ आली व अपघात होवू नयेत यासाठी आवश्यक असणारे सुचना फलक व अन्य बाबीवर त्यांनी काम केले. दि. २८ मे रोजी माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या सुचनेनुसार अॅड. प्रविण पाटील यांच्या समवेत शिष्टमंडळ बामणी पुलाच्या जवळील कामाच्या ठिकाणी गेले.
संबंधित विभागाचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून पाणी जलद गतीने काढण्यासाठी पाईपलाईनची संख्या वाढवावी व पर्यायी रस्त्याची उंची वाढवण्यासंबंधी चर्चा केली. नागरीकांचे हीत डोळ्यासमोर ठेवून तत्परता दाखवली या बद्दल बामणीचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांचे आभार व्यक्त केले आहेत.