लातूर : प्रतिनिधी
मागच्या महिन्यात झालेल्या मान्सूनपूर्व अतिवृष्टीमुळे लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये काही समस्या निर्माण झाल्या होत्या. मार्केट समोरील पटांगणात पाणी साचून भाजीपाल्याचे नुकसान झाल्या संदर्भात शेतकरी व व्यापा-यांकडून तक्रारी आल्या होत्या. त्या ठिकाणी त्वरित आवश्यक त्या दुरुस्त्या करून सोयी, सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना बाजार समिती संचालक मंडळाला देण्यात आल्या होत्या. या अनुषंगाने राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. ६ जून रोजी दुपारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले भाजीमंडईला भेट दिली. यावेळी त्यांनी सुरु असलेल्या विकासकामांची पाहणी करून ती वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिका-यांना दिल्या.
याप्रसंगी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, उपसभापती सुनील पडीले, माजी सभापती ललितभाई शहा, प्रभारी सचिव अरविंद पाटील, सहाय्यक सचिव सतीश भोसले, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, महात्मा फुले भाजी मंडईचे अध्यक्ष विक्रम झाबरे, संचालक बालाप्रसाद बिदादा, सुधीर गोजमगुंडे, शिवाजी कांबळे, बळवंत पाटील, सुभाष घोडके, लक्ष्मण पाटील, बालाजी वाघमारे, सचिन सूर्यवंशी, युवराज जाधव, शिवाजी कांबळे, आनंद पवार, श्रीकांत ठोंबरे, तुळशीराम गंभीरे, इरफान बागवान, गणी बागवान, मेहबूब बागवान, चंद्रकांत पाटील, राम स्वामी, मोहन सुरवसे, सिकंदर पटेल आदिसह भाजी मार्केटमधील अनेक व्यापारी उपस्थित होते.
आमदार अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी बोलताना सांगितले की, मुंबई, पुणे, सोलापूर येथील मार्केटचा अभ्यास करून लातूरच्या भाजी मार्केटचा मास्टर प्लॅन तयार करावा. कांदा-बटाटा मार्केट लवकरच स्वतंत्र जागेत जाईल. भाजी मार्केटशेजारील शासनाची जागा बाजार समितीने घ्यावी. मुलींचे वस्तीगृह बांधण्यासाठी ज्या लोकांची दुकाने पाडली आहेत, त्यांचे लवकरच पुनर्वसन केले जाईल. जनावरांचा बाजार व कोल्ड स्टोरेज नव्या एमआयडीसीत करण्याचा प्रयत्न करावा, तसेच या भाजी मार्केटमध्ये खरेदी-विक्री करून माल साठवण एमआयडीसी गोदामात करावी, असेही त्यांनी सुचवले. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीने लातूरच्या व्यापा-यांना लातूरमध्ये उत्तम व्यवस्था निर्माण करून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. केंद्राकडूनही भाजी मार्केटच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.