जळगाव : प्रतिनिधी
२१ व्या शतकातील २५ वर्षे संपत आली तरी आपल्याकडील अनेक भागात अजूनही अनेक बुसरटलेल्या रूढी-परंपरा पाळल्या जातात. मासिक पाळीबाबत पाळल्या जाणा-या अशाच विटाळातून एका विवाहितेचा जीव गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील किनोद या गावात गायत्री कोळी या २६ वर्षीय विवाहितेने गुरुवारी गळफास घेऊन जीवन संपवले. मात्र या महिलेची तिची सासू आणि नणंदेने मिळून हत्या केल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार गायत्री कोळी ही महिला किनोद या गावात पती, सासू आणि दोन मुलांसह वास्तव्यास होती. तिच्या पतीचा भाजीविक्रीचा व्यवसाय होता. तर गायत्री शिवणकाम करत असे. दरम्यान, गुरुवारी दुपारच्या सुमारास गायत्री हिने गळफास घेतल्याची माहिती तिच्या माहेरच्यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी गायत्रीच्या घरी धाव घेतली. मात्र गायत्री हिने जीवन संपवले नसून तिची हत्या झाल्याचा दावा माहेरच्या नातेवाईकांनी केला.
याबाबत गायत्री हिचा भाऊ सागर कोळी याने धक्कादायक माहिती दिली. गायत्री हिने मासिक पाळी आली असताना जेवण केले होते. मात्र गायत्रीच्या सासूसह इतरांना असे जेवण चालत नव्हते. त्यावरून कुटुंबामध्ये वाद झाला. हा वाद वाढून अखेर गायत्रीची सासू आणि नणंदेने तिला मारहाण केली. तसेच तिची गळा आवळून हत्या केली. तसेच हत्या केल्यानंतर ही आत्महत्या भासावी यासाठी तिचा मृतदेह गळ्याभोवती साडीचा फास लावून लटकवून ठेवला, असा आरोपही त्याने केला. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.