पुणे : महागाई कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे दिसत आहे. जवळपास सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. महागाईने होरपळणा-या सर्वसामान्यांना आता टोल दरवाढीचाही फटका बसणार आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणा-या वाहनधारकांना एक एप्रिलपासून टोल दरवाढीचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे प्रवास करणा-यांना अधिक पैसे खर्च करावे लागतील.
येत्या एक एप्रिलपासून पुणे-मुंबई महामार्गाच्या टोलमध्ये ३ टक्क्यांनी वाढ होणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यानुसार, आता मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावरून प्रवास करताना चारचाकी वाहनांच्या एकेरी प्रवासासाठी अतिरिक्त ५ रुपये मोजावे लागणार आहेत. परतीच्या प्रवासासाठी १० रुपये द्यावे लागतील. इतर श्रेणींतील वाहनांसाठी १५ ते २० रुपयांपर्यंतची टोल दरवाढीचा निर्णय सरकारने घेतला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत मोडणा-या सर्व रस्त्यांवरही टोल दरवाढ होईल.
फास्टॅग नसल्यास दुप्पट टोलची वसुली
येत्या एक एप्रिलपासून प्रत्येक टोलनाक्यावर फास्टॅग लावणे अनिवार्य असणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही रोख, कार्ड किंवा यूपीआयद्वारे टोल भरला तर तुम्हाला टोलचे पैसे डबल भरावे लागतील. टोलची प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यासाठी आणि टोलवरील लागणारा वेळ आणि फास्टॅगचा गोंधळ टाळण्यासाठी प्रत्येक वाहनाला फास्टॅग लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.