पुणे : प्रतिनिधी
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई होणार की नाही, याबाबतचा निर्णय कोण घेणार? याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. भिसे कुटुंबीयांना पाठीशी असल्याचे आश्वासित करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत नेमका काय निर्णय घेणार? याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीस यांच्यावर आरोप केला आहे. डॉक्टर, दीनानाथ रुग्णालय यांना वाचवण्याचे काम देवेंद्र फडणवीस करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे जीव गमावणा-या तनिषा भिसे या गर्भवतीला न्याय मिळणार का? याविषयी साशंकता निर्माण झाली आहे. हे गंभीर प्रकरण घडून १५ दिवस उलटून गेले आहेत. चौकशीसाठी चार समित्या नेमल्या गेल्या, त्यांचे अहवालही सादर झाले, मात्र अद्याप कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचण्यात चौकशी समित्या, शासन, पोलिस प्रशासन या सर्व यंत्रणांना अपयश आले आहे.
सपकाळ म्हणाले, आम्ही सातत्याने आरोप करत होतो की सरकारला प्रकरण दडपायचं आहे. आणि कारण नसताना चुकीची बाजू ते घेत आहेत. ख-याला खरं म्हणणं, चांगल्याला चांगलं म्हणणं हा चांगुलपणा आहे. मात्र या सरकारने हा चांगुलपणा नष्ट केलेला आहे. मातृत्वासाठी आसुसलेल्या एका भगिनीचा मृत्यू होतो आणि त्या मृत्यूचे जे आरोपी आहेत त्या आरोपींना थेट वाचवलं जातंय. मंगेशकर रुग्णालय हे रुग्णांच्या सेवेकरता आहे. मात्र ते त्याठिकाणी धंदा करत आहेत. त्याठिकाणी सावकारी सुरू आहे. त्याठिकाणी दरोडा घालून पैसे द्या तरच उपचार करू, अशी असंवेदनशील अमानवीय व अधर्माची बाजू ही त्याठिकाणी लावून धरली जात आहे.
जोपर्यंत आपण क्लीन चिट देणार नाही तोपर्यंत…
अशा एका रुग्णालयाला हे सरकार वाचवत आहे का? डॉ. घैसास जे वैद्यकीय सेवेची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. जेव्हा माणूस डॉक्टर होतो तेव्हा शपथ घेतो की, मी रुग्णांना सेवा प्रदान करेल. मात्र ते लिहून देतात की, दहा लाख रुपये पहिले जमा करा.. हे काय चाललंय आणि अशा सगळ्यांना वाचवण्याचं काम हे देवेंद्रजी फडणवीस करत आहेत. आता आपल्या सगळ्यांसमोर थेट पुरावा आला आहे. ज्यामध्ये तारीख पे तारीख हे आपण ऐकलं होतं. आता रिपोर्ट आला आहे. निर्दोष करणार नाही. जोपर्यंत आपण क्लीन चिट देणार नाही तोपर्यंत आम्ही तपासण्या आणि समित्या गठित करत राहू, असा त्याचा अर्थ आहे.
विश्वस्त मंडळ बरखास्त करावे
रुग्णालयावर आणि डॉ. केळकरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. जे त्याठिकाणचं विश्वस्त मंडळ आहे. जे विश्वस्त मंडळ त्यांची जी असणारी नियमावली आहे, त्या नियमावलीला बाजूला सारत आहे. एकूण संकेतांना बाजूला सारत आहे. हे विश्वस्त मंडळ बरखास्त करावं. जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली त्याठिकाणी दुसरं विश्वस्त मंडळ स्थापित करावं. ही आमची असणारी मागणी आहे. मात्र याला सरकार वाचवत आहे. आणि दुसरीकडे मंगेशकर परिवाराने साधलेले मौन हे देखील कर्कश आहे.