मुंबई : प्रतिनिधी
जोरदार पावसामुळे पुणे-मुंबई दरम्यान धावणा-या ई-शिवनेरी बससेवेला फटका बसला. मोठ्या प्रमाणात प्रवाशांची संख्या घटल्याने उत्पन्नात घट झाली. अनेक रेल्वे गाड्यांना उशीर झाला. पुणे स्टेशन आणि स्वारगेट बसस्थानकातून धावणा-या ४८ ई-शिवनेरीच्या फे-या रद्द झाल्या.
दरम्यान, पुणे व मुंबई परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबईदरम्यान धावणा-या ‘ई-शिवनेरी’ला फटका बसला. पावसामुळे प्रवाशांची संख्या घटल्याने उत्पन्नात घट झाली, अशी माहिती एसटी प्रशासनाने दिली. दुस-या दिवशी सकाळी सुटणा-या काही रेल्वे गाड्यांनाही उशीर झाला.
पुण्यातून स्वारगेट आणि पुणे स्टेशन या दोन बसस्थानकांतून मुंबई मार्गावर ४८ ई-शिवनेरी धावतात. मुंबईवरून पुण्याला ४८ ई-शिवनेरी धावतात. या मार्गांवर दोन्ही बाजूने दिवसभरात १९२ फे-या होतात; परंतु गेल्या दोन ते तीन दिवसांपासून घाट परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे महामार्गावरील वाहतुकीचा वेग कमी झाला आहे. पावसामुळे प्रवाशांच्या संख्येत घट झाल्याने उत्पन्नात निम्म्याने घट झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
पुणे शहरासह जिल्ह्यात झालेल्या पावसाचा सिंहगड, डेक्कन, प्रगती एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना मंगळवारीही फटका बसला. मुंबईवरून पुण्याला येणा-या इंद्रायणी, इंटरसिटी या दोन्ही गाड्यांना उशीर झाला. शहरासह राज्याच्या अनेक भागांत पावसाने दमदार हजेरी लावल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस वाहतुकीसह रेल्वेसेवेवर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले. पुण्यातून बाहेर जाणा-या आणि पुण्यात दाखल होणा-या बहुतांश बस उशिराने धावत होत्या. तसेच, पुणे-मुंबई दरम्यानच्या रेल्वे सेवेवरही सलग दुस-या दिवशी परिणाम झाला होता. सोमवारप्रमाणे मंगळवारी ‘डेक्कन क्वीन’ उशिराने मुंबईत पोहोचली.
शहरात सोमवारी मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसानंतर मंगळवारी दिवसभर संततधार कायम होती. शहरात रात्री साडेआठपर्यंत १५.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत ४२.१ मिलिमीटर पाऊस झाला होता. पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातही सर्वदूर पावसाची नोंद झाली.
सोमवारी रात्रभर पुण्यात पावसाचा जोर अधिक होता. मंगळवारी सकाळी काही वेळ पावसाने उघडीप दिल्याने काहीसा दिलासा मिळाला होता. त्यानंतर सकाळी दहाच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले आणि त्यानंतर दुपारी चारपर्यंत कधी हलक्या, तर कधी जोरदार सरी सातत्याने पडल्या. शहराच्या काही उपनगरांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक होते. घाट माथ्यावरही काही भागात मुसळधार पाऊस झाला. रात्री आठनंतर पावसाने विश्रांती घेतली होती. वातावरणातील अनुकूल घडामोडींमुळे पुढील दोन दिवस हेच चित्र कायम राहणार आहे.
‘खडकवासला’त वाढ
खडकवासला प्रकल्पांतील चार धरण क्षेत्रात मंगळवारी सायंकाळपर्यंत झालेल्या पावसामुळे ०.१२ अब्ज घनफूट (टीएमसी) इतका साठा वाढला आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात थोडीशी वाढ झाल्याने चारही धरणांतील साठा ५.७४ टीएमसी झाला आहे. खडकवासला धरणात मंगळवारी सायंकाळी पाचपर्यंत २४ मिलीमीटर पाऊस झाला. धरणात १३६१ मिमी पाऊस झाला आहे. सोमवारी धरणात १६ मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत धरणातून ३३.३५ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. पानशेत धरणात सायंकाळी पाच वाजेपर्यंत २५ मिमी पाऊस झाला, तर सोमवारी सर्वाधिक ९९ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली.