परतवाडा : मंगळवारी सायंकाळी सुसाट वेगाने धावणा-या ट्रॅव्हल्सचा मांगिया गावानजीक अपघात झाल्यानंतर, कोलकासनजीक चारचाकी दरीत कोसळून त्यातील प्रवासी किरकोळ जखमी झाले.
बुधवारी सकाळी अपघातग्रस्त ट्रॅव्हल्सची तपासणी आणि चौकशी करण्यासाठी जाणा-या आरटीओच्या चारचाकी वाहनालाही अपघात झाला. यात चालकासह अधिकारी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. २४ तासांमध्ये तीन अपघातांची मालिकाच परतवाडा-धारणी-खंडवा मार्गावर घडली.
धारणी-परतवाडा मार्गावर सेमाडोहच्या भवई घाटात अमरावतीहून धारणीकडे जाणा-या आरटीओ वाहनाला अपघात झाला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. खराब रस्त्यावर भरधाव वाहनाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
पूर्वीच्या आठवणीला उजाळा
याच मार्गावर सेमाडोहनजीक जवाहर कुंड पुलाखाली खासगी ट्रॅव्हल्स कोसळून पाच जण ठार झाले होते. जीवाचा थरकाप उडविणा-या आठवणींचा उजाळा अनेकांना झाला. चालकाच्या निष्काळजीपणामुळे झालेला अपघात पुन्हा झाल्याने यावर नियंत्रण कोणाचे, हा प्रश्न पुढे आला आहे.