मुंबई : प्रतिनिधी
‘‘पहलगामला जो हल्ला झाला, मी त्याच्यावर पहिलं ट्विट केलेलं. ज्यांनी हल्ला केलाय, त्या अतिरेक्यांना, दहशतवाद्यांना कठोरात कठोर पुढच्या पिढ्यांना लक्षात राहील असा धडा शिकवला पाहिजे. दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही’’ अशी पाकिस्तानातील एअर स्ट्राईकनंतर राज ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, मॉक ड्रिल करण्यापेक्षा कोम्बिंग ऑपरेशन करा, जे दहशतवादी आहेत, त्यांना हुडकून काढा. आज नाक्या- नाक्यावर ड्रग्ज मिळतायत, त्याच्या खोलात जाण्याची गरज आहे असे म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वर आपली प्रतिक्रिया देत पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे
. पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, ‘अमेरिकेत दहशतवादी हल्ला झाला म्हणून त्यांनी युद्ध केलं नाही. त्यांनी अतिरेकी ठार मारले’ असे राज ठाकरे म्हणाले. ‘‘दुस-या देशामध्ये युद्ध परिस्थिती आणायचीय. आता मॉक ड्रिल करायचं, सायरन वाजवायचे. मुळात ही गोष्ट का घडली? याचा अंतर्मुख होऊन आपण विचार करणे गरजेचे आहे. मुळात पाकिस्तान हा आधीच बरबाद झालेला देश आहे’’ असे राज ठाकरे म्हणाले.
‘‘ज्या अतिरेक्यांनी तुमच्यावर हल्ला केला, ते अतिरेकी अजून सापडलेले नाहीत. हजारो पर्यटक जिथे जातात तिथे सुरक्षा का नव्हती? मॉक ड्रिलपेक्षा पण कोम्बिंग ऑपरेशन करणं जास्त गरजेचं आहे. एअर स्ट्राईक करून लोकांना वेगळ्या ठिकाणी भरकटवणे यावर युद्ध हे उत्तर होऊ शकत नाही’’ असे राज ठाकरे म्हणाले.