नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे. एकाबाजूला आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना दुसरीकडे मात्र विधानसभेने एक महत्त्वाचा ठराव एकमताने मंजूर केला आहे.
क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, यासाठी केंद्र सरकारला शिफारस करण्याचा ठराव मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत मांडला. भारतरत्न पुरस्कार देण्याबाबत मांडलेल्या या ठरावाला छगन भुजबळ यांनी पाठिंबा दर्शवला. दरम्यान, हा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला.
याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना आनंद व्यक्त केला आहे. क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करुन गौरवण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा महाराष्ट्र विधानसभेने एकमताने मंजूर केलेला ठराव ऐतिहासिक असून प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी महाराष्ट्राच्या लौकिकात भर घालणारा तसेच ‘भारतरत्न’ पुरस्काराचा गौरव वाढवणारा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे.