लातूर : प्रतिनिधी
यंदा नीटमध्ये एनटीएने नवीन बदल केले आहेत. ज्यात दोन महत्वाच्या या बदलांसह केंद्राची संख्यादेखील कमी केली आहे. यंदा लातूर जिल्ह्यात २२ हजार विद्यार्थी नीट परीक्षा देणार आहेत. गतवर्षी २४ हजार ६०० विद्यार्थ्यानी नीट परीक्षत्त दिली होती. गेल्या वर्षीच्या नीटच्या युजी प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर देशभर टीकेचे धनी व्हावे लागल्याने एनटीएने यावेळी अधिक सावधगिरी बाळगली आहे. या अंतर्गत सीबीएसई शाळांऐवजी सरकारी शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, विभाग आणि आयटीआय हे परीक्षा केंद्र बनविण्यात आले आहेत. या नव्या बदलानूसार तीन तास आधी परीक्षेला घेताना सकाळी ११ वाजता केंद्र उघडतील परीक्षा दुपारी २ वाजता होईल. या वेळेपासून अहवाल देणेदेखील सुरु होईल. ही परीक्षा दीड तास उशिरा होणार आहे. दुपारी १२. ३० वाजता कोणालाही परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही.
गत वर्षी नीट परीक्षेत झालेल्या गैर प्रकारामुळे अधिक सुरक्षीत वातावरणात परीक्षा घेण्यासाठी आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) कंबर कसली आहे. तसे नियोजनही केले असून यंदा ४ मे रोजी होणा-या या परीक्षेवेळी प्रत्यक्ष वर्गात प्रत्येक विद्यार्थ्यावर सीसीटीव्हीमार्फत नजर ठेवली जाणार आहे. तर एक-दोन नव्हे तर तीन तास आधीच परीक्षा कक्षात विद्यार्थ्यांना हजर रहावे लागणार आहे.
देशभरातील नामांकित वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व परीक्षा नॅशनल इलिजीबीलीट एन्ट्रन्स टेस्ट (नीट) परीक्षा द्यावी लागते. पदवीसाठी नीट यूजी आणि पदव्युत्तर पदवीसाठी नीट पीजी परीक्षा बंधनकारक असते. त्यानूसार आता पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी नीट युजी ही परीक्षा ४ मे रोजी घेण्यात येणार आहे. त्याचे हॉलतिकीट १ मे रोजी विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिले जाणार असल्याचे नीट परीक्षा निरीक्षक पोतदार यांनी सांगीतले.