जम्मू : वृत्तसंस्था
रस्त्यांच्या बांधकाम आणि देखभालीसाठी टोल टॅक्स हा प्रमुख स्रोत आहे. मात्र आता टोल टॅक्सवरून कोर्टाने चांगलेच फटकारले आहे. जर रस्त्याची स्थिती चांगली नसेल तर तुम्ही टोल टॅक्स वसूल करू शकत नाही असे जम्मू काश्मीर आणि लडाख हायकोर्टाने म्हटले आहे.हायकोर्टाने एका याचिकेवर सुनावणी करताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला रस्ता खराब असल्याने त्यावरील टोल ८० टक्के कमी करण्याचे आदेश दिले. सुगंधा साहनी या महिलेने यासंदर्भात याचिका दाखल केली होती.
जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर ते तामिळनाडूमधील कन्याकुमारी पर्यंत जाणा-या ४,११२ किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग ४४ बाबतच्या एका प्रकरणावर सुनावणी सुरु होती. जर एखाद्या रस्त्यावर बांधकाम सुरू असेल आणि त्याची स्थिती चांगली नसेल तर त्यासाठी टोल टॅक्स घेतला जाऊ नये. चांगल्या रस्त्यासाठी टोल घेतला जातो. पण तो खराब असेल तर टोल का आकारायचा?, असा सवाल हायकोर्टाने केला.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लखनपूर आणि बन प्लाझामधून टोलवसुली ८० टक्क्यांनी लगेच कमी करावी. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी आणि रस्त्याच्या दुरुस्तीचे काम होत नाही तोपर्यंत टोलमध्ये वाढ होणार नाही. फक्त पैसे कमावण्यासाठी जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये टोल नाके उभे राहायला नकोत, असे खंडपीठाने म्हटले.