काठमांडू : वृत्तसंस्था
नेपाळमध्ये राजेशाही परत आणण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले, त्यात दोघे ठार आणि ३० जण जखमी झाले. काठमांडूसह हिंसाचारग्रस्त तीन ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली.
दरम्यान, नेपाळचे माजी पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी माजी राजे ज्ञानेंद्र शाह यांच्यावर हिंसाचार भडकवल्याचा आरोप केला आहे. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपत्कालीन मंत्रिमंडळाची बैठक बोलावली असून ज्ञानेंद्र शाह यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याचे वृत्तात म्हटले आहे.
निदर्शकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा आणि पाण्याच्या फवा-यांचा वापर केला. टिनकुने भागात परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यावर पोलिसांनी हवेत गोळीबार केला. येथे हजारो राजेशाही समर्थकांनी नेपाळमध्ये राजेशाही पुन्हा आणण्याची मागणी करत घोषणाबाजी केली.
काठमांडू येथील २९ वर्षीय सबीन महाजन यांना या संघर्षादरम्यान गोळी लागल्याने रुग्णालयात मृत्यू झाला. टिनकुने परिसरातील एका इमारतीतून निषेधाचा व्हिडीओ शूट करताना ऍव्हेन्यूज टेलिव्हिजनचे छायाचित्रकार सुरेश रजक यांचा मृत्यू झाला. टिनकुने भागात, राजेशाही समर्थकांची सुरक्षा कर्मचा-यांशी झटापट झाली आणि त्यांनी सुरक्षा बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला.
रस्त्यावर उतरलेल्या निदर्शकांनी नेपाळचा राष्ट्रध्वज आणि माजी राजा ज्ञानेंद्र शाह यांचे फोटो हातात घेतले होते. त्यांची पोलिसांशी झटापट झाली. या चकमकीत एक जण जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. राजेशाही समर्थक आणि विरोधकांनी वेगवेगळी निदर्शने केल्याने संघर्ष टाळण्यासाठी काठमांडूमध्ये शेकडो दंगलविरोधी दल तैनात करावे लागले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पश्चिम काठमांडूच्या रस्त्यांवर सैन्य तैनात करण्यात आले.