26.1 C
Latur
Sunday, July 7, 2024
Homeराष्ट्रीयराज्यसभेत भाजपच्या अडचणी वाढणार

राज्यसभेत भाजपच्या अडचणी वाढणार

बिजू जनता दलाने सोडली साथ, विधेयक मंजुरीचे आव्हान
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभेत विरोधकांची ताकद वाढल्यानंतर आता राज्यसभेतही मोदी सरकारचे टेन्शन वाढले आहे. तीन तलाक, सीएए आणि कलम ३७० प्रकरणी भाजपची साथ देणा-या ओडिशातील बीजू जनता दलाने आता एनडीएला रामराम केल्याचे चित्र आहे. राज्यसभेत पंतप्रधानांच्या भाषणावेळी घोषणाबाजी करत बीजेडीच्या खासदारांनी वॉक आऊट केले. बीजेडीकडे राज्यसभेत ९ खासदार आहेत.

राज्यसभेत सध्या एकूण २४५ खासदार आहेत. अशा परिस्थितीत कोणतेही विधेयक मंजूर करण्यासाठी सरकारला १२३ खासदारांच्या पाठिंब्याची गरज असते. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे राज्यसभेत केवळ ११४ खासदार आहेत. कोणतेही विधेयक मंजूर करण्यासाठी त्यांना आणखी ११ खासदारांची आवश्यकता असेल. यावेळी ओडिशामध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणुका झाल्या असून दमदार कामगिरी करत भाजपने बिजू जनता दलाला राज्यातील सत्तेतून हद्दपार केले. निवडणुकीपूर्वी ओडिशात भाजप आणि बीजेडी यांच्यात युती होण्याची शक्यता वर्तवली जात होती, पण तसे झाले नाही.

आतापर्यंत भाजपला पाठिंबा
नवीन पटनायक यांचा बीजेडी राज्यसभेत भाजपच्या संकटमोचक पक्ष म्हणून राहिला आहे. लोकसभेत जेव्हा जेव्हा विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव आणला तेव्हा बीजेडीने भाजपला पाठिंबा दिला. कलम ३७० रद्द करण्याचे विधेयक, तिहेरी तलाक बेकायदेशीर ठरवणारे विधेयक आणि नागरिकत्व दुरुस्ती विधेयक यासह अनेक महत्त्वाच्या प्रसंगी नवीन पटनायक यांचा पक्ष भाजपसोबत उभा राहिला. परंतु सध्याची राजकीय परिस्थिती पाहता बीजेडी आता भाजपसोबत नाही. त्याची मोठी किंमत भाजपला मोजावी लागू शकते.

आता बीजेडी भाजपच्या विरोधात
ओडिशाचे माजी मुख्यमंत्री आणि बीजेडी प्रमुख नवीन पटनायक यांनी त्यांच्या पक्षाच्या राज्यसभा खासदारांसोबत बैठक घेतली होती. त्यामध्ये त्यांनी ओडिशाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. आता भाजपला पाठिंबा देणार नाही तर फक्त विरोध करणार असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR